जिल्हा रुग्णालयाच्या कारभाराबाबत गेले दोन वर्षे अनेक गैरकारभाराचे विषय समोर येत आहेत. जिल्हाधिकारी, जिल्हा प्रशासन आणि अगदी वरती मंत्र्यांपर्यंतही हे सारे विषय पोहोचलेले आहेत. परंतु भाजपने मांडलेल्या या सर्व मुद्द्यांकडे दुर्लक्षच करायचे, असे सत्ताधाऱ्यांचे धोरण ठरलेले दिसते; असा थेट आरोप भाजयुमोचे अनिकेत पटवर्धन यांनी केला आहे.
दोन दिवसांपूर्वी कोरोनामध्ये पत्नी गमावलेल्या पतीची कहाणी अनेक माध्यमातून समोर आली. वृत्तपत्रांनी याची मोठी बातमी प्रसिद्ध केली होती. कोरोनामुळे पत्नी गमावली, पोर्टलवर डिस्चार्ज दिल्याचे दाखवले आहे. तसेच मृत्यू प्रमाणपत्र दिल्यामुळे पतीने गोंधळ घातला. पतीने सांगितले कि, माझ्या पत्नीला डिस्चार्ज दिला आहे तर, माझी पत्नी मला आणून द्या, ती अजून घरी आलेली नाही. असे म्हटल्यावर महिला रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले. प्रशासन मात्र यापासून अजूनही नामानिराळे राहिले आहे. अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. खर तर अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर त्वरित निलंबनाची कारवाई व्हायला हवी. मयत झालेल्यांची नावे नाहीत पण जीवंत असणाऱ्यांची नावेसुद्धा देऊन पन्नास हजार रुपये लाटले जात आहेत का, याबाबतचा खुलासा जिल्हा रुग्णालयाने करावा, अशी मागणी पटवर्धन यांनी केली आहे.
कोरोनामुळे अनेकांचे नातेवाईक गेले. त्यांचे दुःख खूप मोठे आहे. परंतु कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या मयत व्यक्तीच्या नातेवाईकांना पन्नास हजार रुपये मदत मिळत असल्याने जणू काही मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार महिला रुग्णालयात घडलेला उघडकीस आला आहे. पैसे मिळणार, म्हणून तुम्ही जिवंत माणसालाही मयत दाखवणार का, असा खडा सवाल अनिकेत पटवर्धन यांनी केला.
जिल्हा शासकीय रुग्णालयात सावळा गोंधळ सुरू आहे. अशा अनागोंदी कारभाराने रुग्णालयाच्या अशा कामगिरीची सर्वत्र चर्चा होत आहे. जिल्हा रुग्णालयातील बेजबाबदार अधिकाऱ्यांचे निलंबन करावे आणि जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी रुग्णालय सुधारणेसाठी तत्काळ पाऊल उचलावे , असे प्रतिपादन भाजयुमोचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी केले.