काही केल्या एसटीचा संप संपुष्टात येत नसल्याने अखेर एसटी महामंडळाने कर्मचार्यांच्या विभागांतर्गत बदल्या करायला सुरुवात केली आहे. मुंबई, पुणे, ठाणे, औरंगाबाद, यवतमाळ, अहमदनगर आणि इतर विभागांनी कर्मचार्यांच्या बदल्या केल्या आहेत. कोरोना टाळेबंदीत एसटी वाहतूक ठप्प झाल्यामुळे महामंडळाचे उत्पन्न बुडाले आहे. कमी वेतन, तेसुद्धा अनियमित, कुटुंबाचे पोषण, बँकेचे थकलेले हप्ते, घरखर्च, वैद्यकीय खर्च आणि अन्य समस्यांमुळे अनेक कर्मचार्यांनी मानसिक तणावातून आत्महत्या केल्या.
काही दिवसांपूर्वी परिवहन मंत्री अनिल परब यांनी आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचार्यांच्या वारसांचा सहानुभूतिपूर्वक विचार करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार अशा कर्मचार्यांच्या वारसांना एसटी महामंडळात अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्यासाठी चाचपणीला सुरूवात झाली आहे.
महिन्याभरापासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री अनिल परब यांनी आता कडक कारवाईची भूमिका घेतली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना ही अखेरची संधी देण्यात येत आहे. जे सोमवारपर्यंत कामावर रुजू होतील, त्यांचं निलंबन मागे घेऊ, असे अनिल परब यांनी म्हटले आहे. एसटी कर्मचाऱ्यांना ही अखेरची संधी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
निलंबन, सेवा समाप्तीच्या कारवाईनंतरही संपकरी एसटी कर्मचारी कामावर हजर होत नसल्यामुळे महामंडळाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. महामंडळाने कुटुंब सुरक्षा योजनेंतर्गत नियुक्त केलेल्या कर्मचार्यांना त्वरित रुजू होण्याचे निर्देश काढले असून, संपकर्यांवर आता बदलीच्या कारवाईचा बडगाही उगारला आहे.
एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचार्यांनी महिनाभरापासून संप पुकारला आहे. राज्य सरकारने एसटी कर्मचार्यांना वेतनवाढ जाहीर करून कामावर हजर होण्याचे आवाहन वारंवार केले, मात्र तरीही संप सुरूच आहे.