गेल्या ३ वर्षांत तब्बल ९१४ प्राण्यांचा जीव वाचवला गेला, तर ५६ प्राण्यांना जीवाला मुकावे लागले. आजही वनविभागाची यंत्रणा वन्यजीव प्राण्यांच्या संरक्षणासाठी सातत्याने प्रयत्न करताना बचावकार्यासाठी अत्याधुनिक यंत्रणेचा वापरही सुरू केला आहे. वनविभाग अथवा आपत्ती व्यवस्थापन विभाग असो, रात्री- अपरात्री प्राणी संकटात सापडल्याचा फोन येतो, तेव्हा ही यंत्रणा वेळ न घालवता तितक्याच तत्परतेने घटनास्थळी पोहोचते आणि प्राण्यांचा जीव वाचवते. जंगलात पाणवठे कमी प्रमाणात असल्याने बऱ्याचदा हे प्राणी पायथ्यालगतच्या गावात येत असतात. त्यातून काही प्राणी भक्ष्य पकडताना विहिरीत किंवा खोल खड्ड्यात पडण्याचे प्रकार नियमित घडतात. विशेषतः विहिरीत बिबट्या, डुक्कर, रानगवा, सांबर, माकड, मगर असे प्राणी अडकल्याच्या घटना अधूनमधून घडतच असतात.
२०२१-२२ मध्ये २३५ प्राण्यांना जीवदान देत नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. तसेच २०२३ मध्ये ४०८ आणि २०२४ मध्ये २७१ अशा एकूण ९१४ प्राण्यांचे जीव ३ वर्षांत वाचवण्यात आले. यामध्ये ७२ पाळीव प्राणी, साप व पक्ष्यांचे जीवही वाचवण्यात यश आले. बऱ्याचदा शेताला तारेचे कुंपण करून त्यात विद्युतप्रवाह सोडला जातो. यामध्येही प्राण्यांसह पक्ष्यांना जीव गमवावा लागतो. ग्रामीण भागातील अनेक विहिरी उघड्या असल्याने बिबट्या किंवा अन्य प्राणी भक्ष्य पकडण्याच्या नादात विहिरीत पडतात. बिबट्याला बाहेर काढताना कसरत करावी लागते. जंगलतोडीचे प्रकार घडत असल्याने त्या ठिकाणच्या पक्ष्यांच्या अधिवासाला धोका पोहोचत आहे.