जिल्ह्यातील शहर आणि उपनगरातील मोकाट गुरे यांची संख्या वाढली असून मोठ्या प्रमाणात अपघात होत असून मोकाट जनावरांवर कारवाई करण्याबाबत संबंधीत प्रशासनाच्या संबंधित विभागाची बेपर्वाई, उदासीनता दिसून येते. रात्रीच्या वाढते अपघात रोखण्यासाठी मोकाट गुरांच्या मानेला रिफ्लेक्टर पट्टा आणि शिंगावर रेडीयम लावा. यासाठी लागणाऱ्या निधीची तरतुद जिल्हा नियोजनमधून करावी अशी मागणी रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. मोकाट जनावरे आज अक्षरशः नागरिकांच्या जिवावर उठली आहेत. मात्र या समस्येपासून नागरिकांची सुटका करण्यात संबंधित प्रशासनाकडुन कोणतीच ठोस भूमिका घेत नसल्याचे दिसून येत आहे.
मोकाट गुरे घोळक्याने फिरत असल्याने जिल्ह्यामध्ये रात्रीच्यावेळी मोठ्याप्रमाणत अपघात होत असून जखमी झालेल्यांचेही प्रमाण मोठे आहे. रात्रीच्यावेळी ही मोकाट जनावरे दिसणे अशक्य होत आहेत. यातून अपघात होणे, वाहनचालक पडणे, वाहनांचे नुकसान होणे असे प्रकार घडतात त्यामुळे रात्रीची वेळ ही कामगारांसाठी अतिशय कठीण असून ही आज गंभीर बाब असल्याचे जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर यांनी सांगितले. रात्रीच्यावेळी ही जनावरे दीसण्यासाठी ठोस उपाययोजना म्हणुन त्यांच्या मानेला रिफ्लेक्टर पट्टा आणि शिंगावर रेडीयम लावणे गरजेचे आहे. जेणेकरून ही मोकाट गुरे रात्रिच्यावेळी दिसतील.
त्यामुळे जिल्ह्यामध्ये होणारे रात्रीचे अपघात टाळले जातील व जिवित हानी होणार नाही. त्यासाठी निधीची तरतूद जिल्हा नियोजनमधून करणे गरजेचे असल्याचे जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर यांनी जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिले. जिल्हाधिकारी यांनी लवकरात लवकर जिल्ह्यातिल चार मुख्याधिकारी तसेच इतर संबंधीत अधिकारी यांना घेउन बैठक लावुन तुमचा विषय मार्गी लावू असे आश्वासन दिले. त्यावेळी त्यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे रत्नागिरी तालुकाध्यक्ष राजन सुर्वे, ओबिसी सेलचे जिल्हाध्यक्ष सिध्देश शिवलकर, विद्यार्थी सेलचे जिल्हाध्यक्ष संकेत कदम, गोळप जिल्हापरीषद गट अध्यक्ष श्री. सुकेश शिवलकर आदी उपस्थीत होते.