रत्नागिरीमध्ये आरजू नावाच्या कंपनीने व्यवसाय देतो, असे सांगून शेकडो गुंतवणूकदारांच्या फसवणूक प्रकरणाचा अद्याप निकाल लागलेला नाही. कोट्यवधीची या फसवणूक झालेले ग्राहक आर्थिक अडचणीत आहेत, तसेच मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. फसवणूक प्रकरणातील गुंतवणूकदारांना न्याय मिळावा यासाठी फसवणूक झालेल्या ग्राहकांतर्फे १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा दिला आहे. या उपोषणाच्या दिवशी विलास वामन सुर्वे व गौतम गमरे हे मुख्य लोक उपोषणाला बसणार असून, त्यांच्या समवेत इतर सदस्य या वेळी उपस्थित राहणार आहेत. आरजू कंपनीच्या वतीने अनेक लोकांना व्यवसाय, उद्योग सुरू करून देतो, असे सांगून रत्नागिरी तालुका तसेच आजूबाजूच्या परिसरातील अनेक लोकांनी कंपनीमध्ये गुंतवणूक केली.
अक्षरशः या कंपनीने कोणत्याही प्रकारचा रोजगार उपलब्ध करून न देता गुंतवणूक केलेल्या लोकांची म्हणजेच ग्राहकांची फसवणूक केल्याची घटना दोन वर्षांपूर्वी घडली होती. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यामध्ये गुन्हादेखील नोंद केला आहे; मात्र याचा तपास कशा पद्धतीने चालू आहे, हे अद्याप तक्रारदारांना सांगितले जात नसल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. त्याचप्रमाणे या घटनेतील मुख्य आरोपी का पकडला जात नाही ? तो कुठे आहे? कुठल्या गावात राहतो आणि आमचे सर्व ग्राहकांचे पैसे कसे मिळवून देणार आहेत, असे असंख्य सवाल ग्राहकांनी उपस्थित केले आहेत. याच्या निषेधार्थ १५ ऑगस्टला उपोषण छेडण्यात येणार असल्याची माहिती दीपराज शिंदे यांनी दिली आहे.