गुरूवारपासून शहरासह तालुक्यात सर्वत्र दमदार पाऊस पडत असल्याने या पावसामुळे भातलावणीच्या कामाला वेग आला आहे. मात्र या पावसाने तालुक्याच्या करक, नाटे, अणसूरेसह अन्य काही भागात पडझडीच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान, अर्जुना आणि कोदवली नदीचे पाणी सातत्याने वाढत असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गुरूवारी शहर आणि तालुका परिसरात दिवसभर संततधार पाऊस झाला. यामध्ये सागरी महामार्गावर नाटे वाघेरी मोरीवर रस्ता खचला आहे. तर अणसूर येथील पांगेरकरवाडीत अनंत कल्याण पंगेरकर यांच्या घरावर भिंत कोसळल्याने घराचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जिवितहानी झालेली नाही.
गुरूवारी सकाळी ६.३० वाजण्याच्या दरम्यान अनंत पंगेरकर व त्यांची पत्नी चूल पेटवण्यासाठी बाहेर गेले. चूल पेटवून घरात येत असतानाच अमोल सदानंद पंगेरकर याचा इमारतीची भिंत कोसळून अनंत पंगेरकर यांच्या घरावर पडली. मागचा दरवाजा फोडून ४-५ चिरे घरात पडले. यामध्ये अनंत पंगेरकर दांपत्य बालंबाल बचावले. तर करक जिल्हा परिषद शाळा क्रमांक तीनच्या नजीक असलेल्या अंगणवाडीचे कंपाऊंड कोसळून नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार शीतल जाधव यांनी दिले आहेत. दरम्यान करक पांगरी येथील अर्जुना धरण ९७ टक्के क्षमतेने भरले आहे.
त्यामुळे धरणामध्ये पाणीसाठा पूर्ण क्षमतेने झाल्यानंतर कोणत्याही क्षणी सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू होऊ शकतो. यामुळे अर्जुना व कोदवली नदीच्या पाणीपातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तरी खबरदारी म्हणून नदीकाठच्या नागरिकांनी सावध रहावे असे आवाहन पाटबंधारे विभाग लांजा कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. त्याबाबतची लेखी माहिती संबंधित विभागाने धरण क्षेत्रातील व अर्जुना नदी परिसरातील ग्रामपंचायती, नगर परिषद राजापूर व तहसिलदारांना दिली आहे. या पार्श्वभूमीवर अर्जुना व कोदवली नदीच्या पाणीपातळीमध्ये वाढ होण्याची शक्यतेच्या अनुषंगाने खबरदारी म्हणून राजापूर नगर परिषदेच्या वतीने व्यापारी व नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.