राजापूर तालुक्यातील पाचल येथे सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे अर्जुना धरणाची पाण्याची पातळी वाढली असून, मोठा पूर आला आहे. पाचलमध्ये गेले तीन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसाने नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. पाचल येथील मोरी देखील पाण्याखाली गेली असल्याने येथील रहदारी व वाहतूक पूर्ण बंद ठेवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे अर्जुना धरणाच्या उजव्या कालव्याचा काही भाग वाहून गेला आहे.
पावसामुळे पाचल वाहतुकीचा रस्ता पाण्याखाली गेल्याने या रस्त्यावरील वाहतूक काहीकाळ ठप्प होती. नदी काठाची शेती देखील पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. गेले तीन दिवस होणाऱ्या पावसाच्या माऱ्याने पाचलसह पूर्ण जिल्ह्याला झोडपून काढले आहे. त्यामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले असून, शेतीची कामाचाही खोळंबा झाला आहे. अर्जुना धरणाचा सुमारे एक किमी लांबीचा उजवा कालवा भरपूर कोसळणाऱ्या पावसामुळे वाहून गेला आहे. कालव्यातील सिमेंटचा थर वाहून जाऊ लागल्याने, पावसाची संततधार अशीच राहिली तर, कालवा संपूर्ण फुटून, बाजूला राहणाऱ्या लोकवस्तीला धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अर्जुना नदीवर बांधण्यात आलेले धरण हा जिल्ह्यातील एका मोठ्या प्रकल्पापैकी एक असून, मागील ४ वर्षापासून धरणामध्ये पाण्याचा साठा करायला सुरुवात केली जात असून पण कालव्याचे काम संथ गतीने सुरु असल्याने शेतकर्यांना अद्याप शेतीसाठी इथून पाणी मिळत नाही आहे. त्यात आता उजवा कालवा फुटल्याने कालव्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामावर शिक्कामोर्तब झाले आहे. मोठ्या प्रमाणात वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे शेती, घरे, गुरे वाहून जातात कि काय अशी चिंता ग्रामस्थांना सतावू लागली आहे.