रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथे असलेल्या जिंदाल कंपनीत गुरु. दि. १२ डिसें. २०२४ रोजी वायु गळती झाली आणि मग साऱ्या परिसरात हलकल्लोळ उडाला.
काही विद्यार्थी बेहोश – सुरुवातीला कुणाला काहीच समजले नाही. वायु गळतीमुळे जवळच असलेल्या जयगड माध्यमिक विद्यामंदिरमधील विद्यार्थ्यांना त्रास सुरु झाला. विद्यार्थ्यांना मळमळू लागले, उलट्या होऊ लागल्या, श्वास कोंडला, चक्कर आली आणि काहीजण तर बेहोश होऊन खाली पडले. हे सर्व अकस्मात घडल्याने शाळेतील शिक्षक चक्रावून गेले. काही वेळानंतर कंपनीतील झालेल्या वायुगळतीचा हा परिणाम असल्याचे ध्यानी येताच धावपळ सुरु झाली.
वाहने दिली नाहीत ! – जिंदाल कंपनीचा तेथे एक दवाखाना आहे. विद्यार्थ्यांना तेथे नेण्यात आले. तसेच काही विद्यार्थ्यांना जयगड प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. ज्या विद्यार्थ्यांना गंभीर स्वरुपाचा त्रास नव्हता त्यांना प्राथमिक उपचार करुन घरी पाठवण्यात आले आणि ज्या विद्यार्थ्यांना पुढील उपचाराची आवश्यकता होती त्यांना रत्नागिरीतील सिव्हील हॉस्पिटलम ध्ये नेण्यास सांगण्यात आले. परंतु ४५ कि.मी. अंतरावर रत्नागिरीत नेण्यासाठी कंपनीने वाहने दिली नाहीत.
तब्बल ७१ जणांना बाधा – या वायुगळतीशी आमचा संबंध नाही असे सुरुवातीपासून भासवण्यात आले. अखेर हतबल झालेल्या पालकांनी स्थानिक वाहन मालकांकडे धाव घेतली. त्यांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखून विद्यार्थ्यांना रत्नागिरीत सिव्हील हॉस्पिटलमध्ये आणून सोडले. गुरु. दि. १२ रोजी सायंकाळपर्यंत सुमारे ७० विद्यार्थी व १ शिक्षिका असे एकूण ७१ जण वायुबाधित पेशंट सिव्हील हॉस्पिटलम ध्ये दाखल झाले होते. ज्यांना जास्त वायुबाधा झाल्याचे आढळून आले त्यांना आयसीयुमध्ये ठेवण्यात आले व उर्वरीत विद्यार्थ्यांना २ दिवसात टप्प्या टप्प्याने घरी पाठवण्यात आले.
आज २० जणांना बांधा – या घटनेला ७२ तास लोटण्यापूर्वीच आज सोम. दि. १६ रोजी या वायुबाधेने त्रस्त झालेल्या २० जणांना तातडीने रत्नागिरीत आणण्यात आले. त्यामध्ये १८ विद्यार्थी असून २ प्रौढ असून १ पुरुष व. १ महिला आहे. या १८ विद्यार्थ्यांपैकी ८ जणांना सिव्हील हॉस्पिटलमधून उपचार करुन घरी पाठवण्यात आले होते. त्यांना पुन्हा त्रास सुरु झाल्याने आज तातडीने रत्नागिरीत आणावे लागले. उर्वरीत विद्यार्थी व प्रौढ नव्याने दाखल झाल्याचे त्यांच्यासोबत आलेल्या ग्रामस्थांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले.
सिव्हीलमध्ये जायचे नाही ! – सिव्हील हॉस्पिटलमध्ये ७१ वायुबाधीतांना दाखल करण्यात आले होते. त्यापैकी ज्यांना अधिक उपचारांची गरज आहे त्यांना आयसीयुमध्ये ठेऊन उर्वरीत बाधितांना २ दिवसोत टप्प्या टप्प्याने डिस्चार्ज देण्यात आला. त्यापैकी सुमारे ८ विद्यार्थी पुन्हा त्रास सुरु झाल्याने आज त्यांना रत्नागिरीत आणून परकार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्या पालकांनी व ग्रामस्थांनी सांगितले की सिव्हील हॉस्पिटलमध्ये आमच्या मुलांवर व्यवस्थित उपचार झाले नाहीत म्हणून त्यांना पुन्हा त्रास सुरु झाला. त्या कर्मदरिद्री सिव्हील हॉस्पिटलमध्ये आम्हाला जायचे नाही असे संतप्त ग्रामस्थांनी सडतोडपणे सांगितले.
कंपनी बंद करण्याची मागणी – यावेळी जयगर्ड पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी सांगितले की कंपनी खोटारडेपणा करणारी आहे. या कंपनीने आजवर ग्रामस्थांना दिलेली आश्वासने कधीही पाळली नाहीत. कंपनीचा कुणीही अधिकारी वायुबाधा झालेल्या विद्यार्थ्यांची व ग्रामस्थांची चौकशी करण्यासाठी आजवर आलेला नाही. जो कोणी एक प्रतिनिधी आज येथे उगवला तो देखील उन्मत्तपणाची भाषा करतो. “असे प्रकार होणारच, त्याची सवय करुन घ्या” असे तो सांगतो. म्हणूनच ही कंपनी ताबडतोब बंद करण्यात यावी अशी मागणी या ग्रामस्थांनी केली आहे.