देशातील ११ केंद्रीय कामगार संघटनांनी पुकारलेल्या गुरूवारच्या देशव्यापी संपामध्ये ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे रत्नागिरी मधील सर्व सभासद सहभागी झाले होते व रत्नागिरीमध्येही हा संप पुर्णतः यशस्वी झाल्याचा दावा संघटना प्रतिनिधींनी केला. संपावर गेलेल्या बँक कर्मचाऱ्यांनी रत्नागिरीत जोरदार निदर्शने करत कामगार विरोधी धोरणांचा निषेध केला. केंद्र सरकारने जाहीर केल्याप्रमाणे नवीन कामगार संहिता (लेबर कोड) दिनांक १ नोव्हेंबर २०२५ पासून देशामध्ये लागू होणार होते. प्रचलित २९ कामगार कायद्यांचे रुपांतर नवीन ४ लेबर कोडमध्ये करण्यात आले आहे. कामगार संघटनांनी व कामगारांनी वर्षानुवर्षे लढा देवून संघर्ष करून मिळविलेले सर्व हक्क यामुळे नष्ट होणार आहेत. प्रचलित २९ कायद्यांमध्ये एकूणच कामगार व कर्मचारी यांना असलेली सुरक्षितता तसेच त्यांच्या नोकरीची शाश्वती व मिळणाऱ्या इतर सेवा शर्तीची शाश्वती व या ४ नवीन लेबर कोड मुळे संपुष्टात येईल अशी भीती या संपानिमित्त सर्व कामगार संघटनांनी व्यक्त केली आहे. सुपर्णतः मालक धार्जिणे, कार्पो रेट धार्जिणे औद्योगिक घराण्याच्या भल्यासाठी करण्यात आलेल्या या लेबर कोडमध्ये अशा अनेक तरतुदी आहेत ज्या कर्मचारी विरोधी असून मालकांसाठी फायद्याच्या आहेत.
संघटना स्थापण्याचा अधिकार जाणार? – उदाहरणच द्यावयाचे झाले तर पुर्वी १०० पर्यंत कामगार असलेली कंपनी अथवा उद्योग बंद करण्यासाठी सरकारची परवानगी आवश्यक नसायची ही संख्या आता वाढवून ३०० करण्यात आली आहे. तसेच राज्यघटनेने कर्मचारी व कामगार यांना संघटना स्थापनेचा दिलेला अधिकार या लेबर कोडमुळे अत्यंत दुरापास्त -व कठीण होणार आहे. फिक्सड टर्म एम्प्लॉयमेंट ही नवीन संकल्पना याद्वारे अंमलात आणण्यात येईल ज्यामुळे नोकरीची शाश्वती व नोकरी नंतर मिळणारी सामाजिक सुरक्षितता वगैरे हे सवृ आता बंद होईल, अशा अनेक कामगार विरोधी तरतुदी या नवीन लेबर कोडमध्ये अंतर्भाव करण्यात आल्या आहेत.
११ संघटनांनी पुकारला संप – देशांमधील सर्वच्या सर्व म्हणजे ११ ही संघटनांनी आजचा देशव्यापी संप पुकारला होता. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन ही बँक कर्मचाऱ्यांची अग्रणी संघटनाही या संपामध्ये संहभागी झाली होती. सरकारच्या एकूणच कामगार विरोधी तसेच जनहित विरोधी धोरणांविरूद्ध जुलै २०२४ मध्ये ही एक दिवसाचा संप या सर्व संघटनांनी केला होता. त्याच आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून आजचा हा संप पुकारण्यात आला होता. किमान वेतन वाढवून २६००० करण्यात यावे, बोनसची मर्यादा दूर करावी यासह हे नवीन लेबर कोड अमलात आणू नयेत अशा विविध मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला होता.
रत्नागिरीत निदर्शने – रत्नागिरीमधील ए.आय.बी.ई.चे बँक कर्मचारी सभासद गुरूवारी सकाळी बँक ऑफ इंडिया, झोनल ऑफिस, शिवाजीनगर येथे सकाळी ११ वाजता जमा झाले होते. व त्यांनी आपल्या मागण्यांच्या पुनरूच्चार करणारी जोरदार निदर्शने यावेळी केली. या संपाचे व निदर्शनांचे नेतृत्व मनोज लिंगायत व राजेंद्र गडवी यांनी केले.

