मुंबई-गोवा महामार्गावरील बावनदी पुलाचे काम पूर्ण होत आले आहे. या पुलावरून एका मार्गिकेवरून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरातील प्रवास सुखकर झाला आहे. दोन्ही बाजूची वाहतूक सुरू होण्यासाठी जून महिना उजाडेल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले. महामार्गावरील चिपळूण, संगमेश्वर बसस्थानक, बावनदी, पाली, लांजा बाजारपेठ येथील पुलांची कामे अपुरी राहिल्यामुळे मुंबई ते गोवा प्रवासात पर्यटकांना त्रास सहन करावा लागत होता. ही कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत यासाठी आंदोलनेही करण्यात आली होती. त्यामुळे ही कामे प्रगतिपथावर आहेत. त्यातील बावनदी येथील सुमारे ७०० मीटर लांबीच्या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. प्रत्यक्ष पूल २१० मीटरचा असून, जोडरस्ते ३०० व २०० मीटर लांबीचे आहेत. निवळी घाट संपला की, बावनदीचा पूल सुरू होतो.
दोनच दिवसांपूर्वी पुलावरून एका बाजूने वाहतूक सुरू केली आहे. पूल वाहतुकीस सुरू झाल्यामुळे खड्ड्यांतून होणारा प्रवास सुखकर झालेला आहे. त्यामुळे वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील किमींचे ४६५ चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे आणि उर्वरित काम सुरू असून, जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत घेतलेल्या आढाव्यात स्पष्ट केले आहे. त्यामुळे महामागविरून प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. तसेच गणेशोत्सवात येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
अवजड वाहनांनाही सहज ये-जा गेल्या अनेक दशकांपासून बावनदीवर असलेला जुना पूल अत्यंत अरुंद आणि कमकुवत झाला होता. पावसाळ्यात या पुलाची स्थिती धोकादायक बनायची, ज्यामुळे अनेकदा वाहतूककोंडी किंवा सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक थांबवावी लागत असे. नवीन पुलाच्या निर्मितीमुळे आता अवजड वाहनांनाही विनासायास ये-जा करता येणार आहे. या पुलामुळे संगमेश्वर आणि रत्नागिरीदरम्यानच्या प्रवासाचा वेळ १५ ते २० मिनिटांनी कमी होईल. नवीन पूल आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बांधण्यात आला असून, तो उंच असल्यामुळे पुराचा धोका कमी आहे.

