मुंबईत सकाळपासून जोरदार पावसाची सुरुवात झाली असून, आज १९ ऑगस्ट, केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला मुंबईतून आरंभ होत आहे. मात्र या यात्रेवर पावसाचं सावट असल्याचं दिसून येत आहे. त्यातच माहिम, शिवाजी पार्क येथील नारायण राणे यांचे शुभेच्छा बॅनर अनधिकृत ठरवून महानगर पालिकेने हटवले. त्यामुळे काही काळ वातावरण तंग झाले आहे.
राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेची रूपरेषा काहीशी अशा प्रकारे आहे. नारायण राणे सकाळी मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर, शिवसेनेच्या गड असलेल्या शिवाजी पार्कमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला वंदन करून, तसंच तिथल्या परिसरामध्ये वृक्षारोपण करणार आहेत. तिथपासून जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली जाणार आहे.
जनआशीर्वाद यात्रेबद्दल मुख्यमंत्री यांनी सूचक इशारा सुद्धा दिला आहे. राज्यामधून कोरोनाची दुसरी लाट अजून संपलेली नाही आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये अनेक प्रयत्नांची पराकाष्ठा करून आपण संसर्ग एका मर्यादेच्या बाहेर वाढू दिलेला नाही. यामध्ये कोरोना योद्धा म्हणून काम केलेले अनेक डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, शासकीय कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स यांचा मोठा वाटा आहे.
कोरोना निर्बंधामध्ये शिथिलता हि केवळ आर्थिक अर्थव्यवस्थेची विस्कटलेली घडी पुन्हा बसविण्यासाठी दिलेली आहे, हे कोणत्याही व्यक्तीने विसरता कामा नये. कोरोनाविषयक नियमांचे पालन न केल्याने, तसेच राजकीय गर्दी जमा करणे, मास्क न लावणे, सोशल अंतर न बाळगणे यामुळे स्वत: बरोबर इतरांच्या आरोग्यालाही आपण धोका पोहचवत आहोत याचे समाजभान असावे, पण जर नियमांचा भंग करून राजकीय, सामाजिक, धार्मिक व इतर कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतील तर, सर्व सामान्य जनतेच्या आरोग्यास धोका निर्माण होईल, अशी काही जणांची वर्तणूक पूर्णतः चुकीची वाटते. त्यामुळे या सर्व बाबी लक्षात घेऊन, कोरोना योद्धा बनता नाही आले तरी, निदान कोरोना स्प्रेडर बनू नये, एक जबाबदार नागरिक म्हणून आमच्या प्रयत्नांना आपल्या सहकार्याची खूप आवश्यकता आहे, असा मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.