मुंबईमध्ये पार पडलेल्या दसरा मेळाव्यानंतर चिपळूणमधील सावर्डेमध्ये शिवसेनाचा मेळावा पार पडला. यावेळी शिवसेनेचे आम. भास्कर जाधव यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. या मेळाव्या प्रसंगी ते म्हणाले कि, मोदींच्या जीवावर शिवसेना निवडून आली असे हल्ली भाजप पक्ष वारंवार म्हणत आहे. पण भाजपने एक गोष्ट कायम लक्षात घेतली पाहिजे की, ज्यावेळी भाजपने शिवसेनेसोबत युती केली त्यावेळी केवळ सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचाच फोटो होता. आज जे मोदीसाहेब पंतप्रधान म्हणून देश चालवत आहेत. त्या नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी गुजरात दंगल प्रकरणात बाळासाहेब ठाकरे हे एकमेव नेतृत्व उभं होत. नाहीतर मोदींचं अस्तित्व केव्हाच नष्ट झालं असतं, याचं भान भाजपने ठेवायला पाहिजे, असा सणसणीत टोला जाधव त्यांनी लगावला.
शिवसेनेने भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला असं म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचाही भास्कर जाधव यांनी चांगलाच समाचार घेतला. ज्यावेळी सरकार बनत नव्हते त्यावेळी ८६ तासांचं राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत सरकार कोणी बनवलं? भाजपनेच ना कि इतर कोणी ? मग स्वत: ठरवावे कोणी कोणाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे ते?
तीन पायाचं सरकार म्हणून महाविकास आघाडीला हिणवणाऱ्या भाजपसोबत आज जे घटक आहेत त्यांनी भाजपचं हिंदुत्व स्वीकारलं आहे का? हे आधी सांगावं, असा थेट सवाल जाधव यांनी फडणवीसांना केला. मुंबई महानगर पालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी भाजप सूडबुद्धीने वागत असून ED, NCB, CBI, इन्कम टॅक्स अश्या केंद्रीय यंत्रणांचा चुकीच्या पद्धतीने वापर करत असल्याचा आरोपही यावेळी भास्कर जाधव यांनी केला आहे. भाजप सोडून इतर सगळे पक्षाचे लोक फक्त भ्रष्टाचारी का? असा सवाल करत सध्या मराठी माणसाला नेस्तनाबूत करण्याच षडयंत्र भाजप करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.