मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटामध्ये रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू असताना दरड कोसळून दोन पोकलेन मातीखाली गेले आणि या दुर्घटनेत एका पोकलेन चालकाचा मृत्यू झाला. दरड खाली आल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. सात तासानंतर दरड बाजूला करून एकेरी वाहतूक तात्पुरत्या स्वरुपात सुरु करण्यात आली आहे. या अपघातानंतर अथक प्रयत्नानंतर दरडीखाली अडकलेला पोकलेनमधील चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले असून, अन्य कोणालाही इजा झाली नसल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली पाटील यांनी दिली आहे.
यानंतर गुहागर-चिपळूण-खेड मतदारसंघाचे आमदार भास्करराव जाधव यांनी घाटामध्ये जावून प्रत्यक्ष पाहणी केली आणि दुर्घटनेमुळे काम थांबवून ठेवल्यास धोका अधिक वाढू शकतो. शिवाय वरच्या भागात परशुराम गाव वसलेले आहे. त्यामुळे या गावातील ग्रामस्थांशी चर्चा करून, काही संभाव्य धोका असल्यास त्याची त्यांना कल्पना देवून हे काम तात्काळ सुरू करा, कोणत्याही परिस्थितीत काम थांबवू नका, काही अडचण आल्यास मला सांगा आपण त्यातून मार्ग काढू, अशी सूचना त्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना केली आहे.
ज्या ठिकाणी दरड कोसळली आहे, तिथे वरच्या बाजूला परशुराम गावात जाणारा रस्ता आणि वस्ती आहे. दरड कोसळल्यामुळे या वस्तीला धोका निर्माण झाला आहे का, याची प्रत्यक्ष जावून पाहणी करावी, अशी सूचना आमदार जाधव यांनी अधिकाऱ्यांना केली आहे. दुर्घटनेनंतर हे काम थांबविण्यात आले आहे. परंतु, कोणत्याही परिस्थितीत काम थांबवू नका. ते आहे तसेच राहिले तर पावसाळयामध्ये खूप मोठा धोका निर्माण होवून पुन्हा दरड कोसळली तर गंभीर परिस्थितीचा सामना करावा लागेल. त्यामुळे परशुरामच्या ग्रामस्थांना विश्वासात घेऊन, त्यांच्याशी चर्चा करा आणि काम तात्काळ सुरू करा, अशीही सूचना यावेळी जाधव यांनी केली आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ते मान्य करून अपघात टाळण्यासाठी रस्त्याच्या बाजूला रेलिंग उभारण्याचेही मान्य केले आहे. .