मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे रत्नागिरीतील भाट्ये आणि कर्ला समुद्रकिनारी पाण्याला जोरदार करेंट निर्माण झाला. त्यामुळे या ठिकाणी उभ्या करून ठेवलेल्या अनेक नौकांच्या नांगराचे दोर तुटले. वादळी वारे आणि अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे शनिवारी आणि त्याआधी समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या नौका रविवारी सकाळीच बंदरात परतल्या. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याचा इशारा हवामान खात्याने दिला. त्यानुसार मत्स्य व्यवसाय विभागाने हा इशारा सहकारी मच्छिमार संस्थाना कळवून समुद्रात गेलेल्या नौकाना बंदरात बोलावून घेण्यास कळवले.
सहकारी संस्थानी त्यांच्या सदस्य असलेल्या नौकांवर संपर्क साधून बंदरात येण्यास सूचित केले. मच्छिमार नौका त्यानुसार मच्छिमार शनिवारी सकाळपर्यंत बंदरात आल्या. धोक्याच्या इशाऱ्यामुळे भाट्ये आणि कर्ला समुद्र किनारी आलेल्या नौका नांगर टाकून उभ्या करून ठेवल्या होत्या, जोरदार वारे आणि मुसळधार पावसामुळे येथील समुद्राचा करंट वाढल्यामुळे येथील अनेक नौकांच्या नांगराचे दोर तुटले. परिणामी या नौका हेलकावे खात किनारा सोडून जाण्याची भिती होती. परंतु नौका मालकांनी प्रसंगावधान राखून नौकांचे दोर झाडांसह ज्या काही वजनी वस्तू असतील त्यांना बांधून आपल्या नौका वाचवल्या.