लाखोंत गुंतवा आणि करोडोंत कमवा’ असे सांगत रत्नागिरीवासियांना कोट्यावधींचा गंडा घालणाऱ्या इन्वेस्टमेंट कंपनीची जोरदार चर्चा गेले काही दिवस सुरू असून फसवल्याची खात्री झालेले अनेक गुंतवणूकदार कपाळावर हात मारून घेत आहेत. विशेष म्हणजे या कंपनीच्या स्कीममध्ये जिल्ह्यातील एका बड्या महिला अधिकाऱ्यानेही तब्बल १ कोटी रूपये व गुंतविल्याची चर्चा सुरू झाल्याने या घोटाळ्याची व्याप्ती खूपच वाढल्याचे पुढे येत आहे. या बड्या अधिकाऱ्यासह कायट्याचे रक्षण करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे अशा खात्यातील अनेकांनी आपली पुंजी या कंपनीत गुंतवली असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान गेले चार-पाच दिवस सुरू असलेल्या फसवणुकीच्या या चर्चेची दखल पोलीस प्रशासनाने घेतल्याचे वृत्त असून लवकरच योग्य ती कायदेशीर कार्यवाही सुरू होईल असे यासंदर्भात पत्रकारांना पोलीसांकडून सांगण्यात आले.
रत्नागिरीकरांना गुंतवणुकीचे आमिष दाखवत नंतर गंडा घालणाऱ्या इन्वेस्टमेंट किंवा ट्रेडिंग कंपन्यां काही नव्या नाहीत. अनेक नॉन बँकींग कंपन्यांनी याआधी अनेकांना मोठा आर्थिक गंडा घातल्याची प्रकरणे उघड झाली आहेत. तरीदेखील पैशाच्या आमिषाला आणि दामदुप्पट रकमेच्या हव्यासाला बळी पडणाऱ्यांची संख्या काही कमी होत नाही आणि रत्नागिरीकरांची फसवणूक काही टळत नाही. या पार्श्वभूमीवर सध्या ‘लाखोंत गुंतवा आणि करोडोंत कमवा’ असे आश्वासन देत ‘चुना’ लावणाऱ्या कंपनीची जोरदार चर्चा सुरू असून या कंपनीच्या कार्यालयात रोज गुंतवणूकदार येवून आपले पैसे परत मागत आहेत.
सेबीची परवानगी नाही? – या कंपनीचे रत्नागिरीमध्ये एका आलिशान इमारतीत कार्यालय असून या कंपनीकडे गुंतवणूकीसाठी आवश्यक असलेली सेबीची परवानगी नसल्याचे बोलले जाते. तरीदेखील अनेकांनी मोठ्या रकमा या कंपनीकडे गुंतविल्या आहेत. त्यामध्ये कायदयाचे रक्षण करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे असे बड़े अधिकारी, त्यांच्या हाताखाली काम करणारी अन्य मंडळी आणि त्यांच्या नातेवाईकांनी लाखो रूपये गुंतवल्याची चर्चा आता कर्मचाऱ्यांमध्ये आणि गुंतवणूकदारांमध्येही सुरू झाली आहे.
३ वर्षापासून गुंतवणूक ? – या कंपनीची खरी सुरुवात गुहागर तालुक्यातून झाल्याचे चर्चिलेः जाते. याच तालुक्यातील एक तरुण या इन्व्हेस्टमेंट /ट्रेडिंग कंपनीचा मास्टरमाईंड असून गेल्या ३ ते ४ वर्षांपासून या कंपनीत जोमात गुंतवणूक त्याने सुरू केली होती अशी चर्चा सुरू आहे. त्याच्यावर विश्वास ठेवून अनेकांनी आपली रक्कम गुंतविली होती.
सुरुवातीला परतावा दिला – ‘लाखोंत गुंतवा आणि करोडोंत कमवा’ या आमिषाला अनेकजण बळी पडले. सुरूवातीला कंपनीने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे योग्य तो परतावादेखील दिला. लोकांना पैसे मिळाले. यामुळे अनेकांचा विश्वास बसला. त्यामुळे कंपनीत गुंतवणूकदेखील वाढली. एजंटांना भरघोस कमिशन मिळाले. त्यामुळे खुश झालेल्या एजंटांती आपले नेटवर्क अधिक वाढवत अनेकांना या कंपनीत पैसे गुंतविण्यास प्रोत्साहन दिले.
अलिशान कार्यालय – ग्राहकांना भुरळ पडावी यासाठी संपूर्ण प्लॅन आधीपासूनच सेट करण्यात आला होता. अलिशान कार्यालये उभी करण्यात आली. एखाद्या बड्या कॉर्पो रेट कंपनीचे कार्यालय फिके पडेल, अशा पद्धतीने कार्यालये सजवण्यात आली होती. डामडौल पाहून अनेकजण भुलले.
गुंतवणुकीचा आकडा मोठा? – या कंपनीत लाखो गुंतवा, करोडो कमवा, अशी ऑफर सुरू होती. त्यामुळे सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांनीदेखील या स्कीममध्ये, मोठ्याप्रमाणात पैसा गुंतवला. काही अधिकाऱ्यांचे आकडे कोटींच्या घरात असल्याची चर्चा आता सुरू आहे. केवळ रत्नागिरीतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात अशाच प्रकारे गुंतवणूक करण्यात आली.
‘त्या’ अधिकाऱ्याचे १ कोटी ? – मात्र हळूहळू दिलेल्या आश्वासनाप्रमाणे परतावा न मिळू लागल्याने गुंतवणूकदारांच्या मनात धाकधूक सुरू झाली. काहींनी याबाबत कंपनीत जाऊन चौकशी केली. आपले मुद्दल तरी परत द्या अशी मागणी अनेक गुंतवणूकदार करत होते. मात्र अनेक अटी आणि शर्थी सांगत कंपनीकडून त्यांना ‘चुना’ लावण्यात आल्याची चर्चा संबंधित गुंतवणूकदारांमध्ये सुरू आहे. गेला आठवडाभर अशा चर्चा सुरू असून त्यामुळे या प्रकरणाला वाचा फुटली आणि आता नवनवीन माहिती पुढे येऊ लागली आहे. फसव्या योजनांना भुलू नका, असे जनतेला आवाहन करणाऱ्या खात्यातील काही बड्या अधिकाऱ्यांसह अनेकांनी आपले पैसे या कंपनीत गुंतविले आहेत अशी चर्चा सुरू झाली आहे. कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी पार पाडणाऱ्या खात्यातील अनेक बड्या अधिकाऱ्यांनी लाखो रूपये या कंपनीच्या स्कीममध्ये गुंतविल्याची चर्चा सुरू आहे. एका बड्या अधिकाऱ्याने तर तब्बल १ कोटी रूपये गुंतविल्याची चर्चा खुलेआम सुरू आहे. मात्र अजूनही कुणीही रितसर तक्रार नोंदविलेली नाही. बदनामी होईल या भीतीपोटी ही तक्रार होत नसल्याचे बोलले जाते.
त्याला फक्त ट्रेडिंगचे काम ? – एका ऑर्डरलीच्या सांगण्यावरून ही रक्कम गुंतविण्यात आल्याचे आता संबंधित खात्यातील कर्मचाऱ्यांमध्ये उघडपणे बोलले जात आहे. सकाळी ऑर्डरली कामावर रुजू झाला की त्याला एकच. काम असते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत बंगल्यात बसून ट्रेडिंग करणे, हेच त्याचे काम आहे असेही उघडपणे आता कर्मचाऱ्यांमध्ये चर्चिले जात आहे.
सेबीची परवानगी नाही? – आता बड्या अधिकाऱ्याचे पैसे अडकल्याने त्याची गांभीर्याने दखल घेतली जात असून या कंपनीला ट्रेडिंग किवा अन्य आर्थिक क्षेत्रातील गुंतवणूकीसाठी लागणारी सेबीची परवानगीदेखील नव्हती असे आता चर्चेतून पुढे आले आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.
आमचे पैसे परत करा ! – दरम्यान या घोटाळ्याची किंवा फसवणुकीची चर्चा सुरू झाल्यानंतर अनेक ग्राहक गुंतवलेली रक्कम परत मि ळवण्यासाठी ‘त्या’ कंपनीच्या रत्नागिरी कार्यालयात गर्दी करू लागले आहेत. तुमचा परतावादेखील नको आणि व्याजपण नको… आमची गुंतवलेली रक्कम परत करा, असा तगादा आता गुंतवणूकदारांनी लावला आहे. मात्र मुदतपूर्व पैसे परत देण्यास संबंधितांकडून नकार मिळत असल्याचे चर्चिले. जात आहे.
जबाबदारी घेणार कोण? – या कंपनीतील ग्राहक- आता चलबिचल झाल्याने त्यांनी थेट कंपनीचे कार्यालय गाठले. येथील कर्मचाऱ्यांनी मात्र हात वर करायला सुरुवात केली आहे. गुंतवलेल्या पैशांची जबाबदारी आता घ्यायची कोणी? असा प्रश्न निर्माण झाला असून यातील मुख्य सूत्रधार मात्र ऐशोआरामात वावरत असल्याची चर्चा सुरू आहे.
सखोल तपासाची मागणी – दरम्यान सेबी किंवा संबंधित वित्तीय कंपन्यांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणाऱ्या यंत्रणांचे सारे नियम धाब्यावर बसवून लोकांना मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यास भाग पाडणाऱ्या आणि आता फसवणूक करणाऱ्या ग्राहकांकडून पोलीसांकडे धाव घेण्यात आली आहे. पोलीसांनी सखोल चौकशी करावी अशी मागणी गुंतवणूकदार करत आहेत. सुरू असलेल्या चर्चेची दखल घेवून योग्य ती पावले. उचलली जातील असे पोलीस प्रशासनाकडून याबाबत विचारले असता पत्रकारांना सांगण्यात आले.