दीपावलीचे सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेऊन लांजातील फ्रेंडस ग्रुपने सलग १८व्या वर्षी कोकणातील सर्वात मोठा व दीपोत्सव उत्साहात साजरा केला. या वेळी १८ हजार ८८८ दीप प्रज्वलित केल्यामुळे लांजा शहरातील परिसर प्रकाशमय झाला होता. महाराष्ट्रात या पद्धतीने दीपोत्सव साजरा करणारे तिसरे ठिकाण आहे. फ्रेंडस् ग्रुपतर्फे दरवर्षी हा दीपोत्सव साजरा करण्यात येतो. ऐतिहासिक शनिवारवाडा व कोल्हापुरातील रंकाळा या ठिकाणी असे आयोजन केले जाते. त्या पाठोपाठ लांजा शहरात या पद्धतीने केलेले नियोजन यशस्वी झाले. या अनोख्या दीपोत्सवाचे उद्घाटन आमदार राजन साळवी यांच्या हस्ते तर सुनील कुरूप यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
या वेळी नगराध्यक्ष मनोहर बाईत, माजी नगराध्यक्षा संपदा वाघदरे, नगरसेविका यामिनी जोईल, मधुरा वापरकर, दुर्वा भाईशेट्ये, नगरसेवक नंदराज कुरूप, संजय यादव आदी मान्यवर उपस्थित होते. या निमित्ताने लांजातील क्रियाशील, निरपेक्षपणे काम करणाऱ्या संस्थांचा कर्तृत्ववान व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. प्रकाश हर्चेकर, युवा उद्योजक गरिब नबाझ नेवरेकर, संस्था कार्यकर्ता अनिलेत कुबडे यांना फ्रेंडस् रत्नपुरस्काराने गौरव करण्यात आला. तसेच खाऊच्या पैशातून महिलाश्रमातील मुलांना फराळ देऊन सामाजिक बांधिलकी जपणारा अर्जून बावधनकर व पन्हळे गावच्या पोलिस पाटीलपदी निवड झालेल्या प्रदीप जोशी यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या निमित्ताने लोकमान्य मल्टिपर्पझ . ऑप. बँकेच्या फ्री लकी कुपन योजनेच्या मानकरी ठरलेल्या भाग्यवान विजेत्यांचा गौरव केला.
मुंबई-गोवा महामार्गावरील लांजा शहरातील न्यू इंग्लिश स्कूल व तुकाराम पुंडलिक शेट्ये कनिष्ठ महाविद्यालयाच्या पटांगणावर लक्ष्मीपूजनाचे औचित्य साधून डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी कलाशिक्षक अजित गोसावी यांच्या संकल्पनेतून रेखाटण्यात आलेली संस्कारभारती व ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त छत्रपती शिवरायांच्या विचारांचा जागर करणारी राजमुद्रा रांगोळी सर्वांच्याच कौतुकाचा विषय ठरली. सुंदर जाधव यांनी दीपोत्सव थीमवर केलेल्या नृत्याने प्रेक्षकांचे मनोरंजन झाले. हा अनोखा दीपोत्सव पाहण्यासाठी लांजावासीयांनी गर्दी केली होती.
दीपोत्सव लांजाची ओळख – याप्रसंगी आमदार साळवी यांनी फ्रेंडस् ग्रुप लांजाचे कौतुक करत समाजाच्या जीवनातील अंध:कार दूर व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. हा दीपोत्सव लांजाची सांस्कृतिक ओळख आहे. सुमारे १८ वर्षे कोकणातील सर्वात मोठ्या दीपोत्सवाचे आयोजन करून भारतीय समृद्ध परंपरेची जोपासना केली आहे, असेही त्यांनी सांगितले.