भाजपच्या नवनियुक्त जिल्हाध्यक्षांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली. यात दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याच्या अध्यक्षपदी अनुभवी आणि ग्रामीण भागात दांडगा संपर्क असलेल्या राजेश सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर उतर रत्नागिरी जिल्ह्याच्या अध्यक्षपदी दापोलीच्या केदार साठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेले अनेक दिवस भाजपच्या जिल्हा कार्यकारणीत बदल होणार अशी चर्चा जोरदार सुरु होती. नुकत्याच झालेल्या भाजपच्या मेळाव्यात भाकरी फिरवण्याचे स्पष्ट संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले होते. त्यानुसार राज्यात अनेक जिल्ह्यात जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तीची घोषणा बावनकुळे यांनी मंगळवारी रात्री उशीरा जाहीर केली.
रत्नागिरीची भौगोलिक परिस्थिती डोळ्यासमोर ठेवून दक्षिण व उत्तर असे जिल्ह्याचे दोन भाग करून दोन जिल्हाध्यक्ष भाजपने दिले आहेत. यापूर्वी दक्षिणसाठी अॅड. दीपक पटवर्धन तर उत्तर भागासाठी डॉ. विनय नातू यांची नियुक्ती करण्यात आली होती. नातू यांनी ६ महिन्यांपूर्वी पदाचा राजीनामा दिला होता. अॅड. दीपक पटवर्धन यांचा कार्यकाळ देखील पूर्ण झाला होता. आता राजेश सावंत यांची रत्नागिरी दक्षिण विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे. सावंत हे भाजपमध्ये उपजिल्हाध्यक्ष पदावर कार्यरत होते. कुशल संघटक असलेल्या राजेश सावंत यांना भाजपमध्ये चांगले स्थान मिळेल असे बोलले जात होते.
रत्नागिरीसह संगमेश्वर, लांजा आणि राजापूर या ४ तालुक्यांसाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. भाजप मधील जुन्या-नव्या सर्वांना बरोबर घेऊन ते पक्ष वाढवतील असा विश्वास भाजपचे संपर्कमंत्री ना. रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला होता. राजेश सावंत यांची जिल्हाध्यक्षपदी निवड होण्यामागे ना. रवींद्र चव्हाण यांची भूमिका महत्वपूर्ण ठरल्याची चर्चा सुरू आहे. निवडणुकांच्या तोंडावर राजेश सावंत यांना जबाबदारी देण्यात आली आहे. जुन्या नव्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वय ठेवून पक्ष संघटना बळकट करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.