चिपळूण हे जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. गेली ८ वर्षे चिपळूण हायटेक बसस्थानकाचे काम सुरु असून आजतगायत ते पूर्ण झालेले नाही. आता त्याच्यावर ‘पत्रा प्लॅन’ करण्यात येणार असल्याचे समजते. हा अक्षरशः निर्लज्जपणाचा बाजार, असल्याचा आरोप करत माजी सभापती शौकत मुकादम यांनी या प्रकारावर कमालीचा संताप व्यक्त केला आहे. जनतेची चेष्टा करू नका. पूर्वीच्या प्लॅन प्रमाणे चिपळूण बसस्थानक हायटेकच झाले पाहिजे, अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल, असा थेट इशाराही त्यांनी एस.टी. महामंडळाला दिला आहे. निधी उपलब्ध होत नसल्याचे कारण पुढे करत एस.टी. महामंडळाने चिपळूण हायटेक बसस्थानक कामाचे पुरते वाटोळे लावले आहे. त्यातच आता मंजूर आराखडा बदलून इमारतीवर स्लॅब ऐवजी पत्राशेड उभारण्याचा निर्णय घेतला असल्याने चिपळुणात प्रवाशांसह राजकीय पुढारी व पदाधिकाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ते हायटेक बसस्थानक होणार म्हणून २०१८ मध्ये तोडले. आता नवीन सुरु असलेल्या कामावर पत्रां प्लॅन करणार म्हणजेच चिपळूणची जनता व प्रवाशी यांच्या नजरेत धूळ फेकीचा प्रकार झाला आहे.
जिल्ह्यातील इतन भागात कोट्यावधीचा निधी खर्च करु विविध प्रकल्प उभे केले जातात. कोकणातील चिपळूण सारख्या महत्वाच्या व मध्यवर्ती ठिकाणी हायटेक बसस्थानक होऊ शकत नाही का? असा संतप्त सवालही त्यांनी केला आहे. महाराष्ट्र शासनाने अनेक रेत स्थानकामध्ये करोडे रुपये खर्च करुन सुशोभीकरण केले. गरीबांची सेवा देणारी एस.टी. बस स्थानकावर महाराष्ट्र शासन हायटेक बस स्थानकावर खर्च करु शकत नाही का? त्यामुळे हायटेक बस स्थानकाला निधीची तरतूद झाली पाहिजे. पूर्वीच्या प्लॅन प्रमाणेच चिपळूणमध्ये हायटेक बस स्थानक झाले पाहिजे, अन्यथा आम्हाला आंदोलन छेडावे लागेल, अर इशारा देखील श्री. मुकादम यांनी प्रशासनाला दिला आहे.

