गावाचा कारभार सांभाळणारी वास्तू कायम भक्कमच असावी असे म्हणतात. जर पायाच डळमळीत असला तर विकासाची कामे सुद्धा डगमगू लागतात. चरवेली ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा आज नाम. उदय सामंत त्यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यावेळी बोलताना ते म्हणाले, ग्रामपंचायत इमारतीचा वापर विकासात्मक दृष्ट्या काम करण्यासाठी झाला पाहिजे, तसेच कामासाठी येथे येणारा प्रत्येक नागरिक काम पूर्ण झाल्याच्या समाधानानेच इथून बाहेर पडला पाहिजे, अशी अपेक्षा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली आहे.
पुढे नाम. सामंत म्हणाले कि, या नूतन इमारतीचा वापर विकासात्मक दृष्ट्या कार्य करण्यासाठी करा. येथील विकासकामे करण्यासाठी आपण कटिबद्ध असून या इमारतीमध्ये, पुढच्या वर्षी कॉमन सभागृहासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. या लोकार्पण सोहळ्याला रत्नागिरीचे नगराध्यक्ष बंड्या साळवी, जि.प.सदस्य बाबू म्हाप, रत्नागिरीचे प्रांत विकास सूर्यवंशी, चरवेलीचे सरपंच सुरेश सावंत, उपसरपंच गजानन नागले, समाज कल्याण सभापती परशुराम कदम, माजी नगराध्यक्ष राहुल पंडित इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होताच, या ठिकाणी एक फूडमॉल उभारून त्या फूडमॉलच्या माध्यमातून स्थानिक तरुण-तरुणींसाठी रोजगार निर्मिती केली जाईल असे आश्वासनही त्यांनी उद्घाटनप्रसंगी दिले. ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीसाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या प्रदीप सावंत व शशिकांत सावंत यांचा सत्कार या कार्यक्रमाच्या वेळी करण्यात आला. चरवेली येथील नागरिक कोरोना निर्बंधांचे पालन करून, मोठ्या संख्येने उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते.