चिपळूण तालुक्यात सुरु असलेल्या रस्त्यांच्या आणि गाळ उपशाच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतुकीसाठी डंपरचा वापर करण्यात येत आहे. स्थानिक अनेक डंपर उपलब्ध असताना सुद्धा रस्त्यांच्या कामासाठी परराज्यातील डंपर मागवून त्याचा वापर करण्यात येत आहे. परंतु, हे परराज्यातील डंपर चालक वाहतुकीच्या नियमांचे तीन तेरा वाजवत असल्याचे निदर्शनास येत आहे. पादचारी आपला जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत.
गेल्या काही महिन्यापासून सुरु असलेल्या कामामुळे खेरशेत ते फरशी तिठ्यापर्यंतच्या ३४ कि.मी. अंतरापर्यंत अनेकदा छोटे मोठे अपघात होणे ही राजरोस घडत आहे. परराज्यातील डंपर्स चालकांच्या बेजबाबदारपणामुळे चिपळूणमधील नागरिक व वाहन चालकांचा प्रवास करताना जीव टांगणीला लागला आहे. आपण सरळमार्गी प्रवास करत असताना, कोणता डंपर चालक वेगाने येईल आणि ठोकेल असे समीकरण झालेले आहे. याबाबत ईगल कंपनीस माहिती दिलेली असतानाही, ती जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे.
मागील आठवड्यात जेंव्हा कॉलेज नुकतीच सुरु झाली, कॉलेजच्या पहिल्याच दिवशी, डंपर चालकाच्या हलगर्जीपणामुळे एका निष्पाप महाविद्यालयीन विद्यार्थीनीला नाहक जीव गमवावा लागला तर चार दिवसांपूर्वी कळंबस्ते येथे मद्यधुंद अवस्थेत, बेभानपणे डंपर चालविणार्या चालकास जागरूक नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले होते.
संबंधित कंपनीचे जनसंपर्क अधिकारी जयंतीभाई यांनी संबंधित डंपर चालकास सेवेतून कमी करण्याचे आश्वासन पोलीस अधिकार्यांसमोर दिले. मात्र अद्यापही कंपनीने डंपर चालकाविरूद्ध कोणतीही कारवाई केली नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे अपघातांची मालिका सुरूच राहणार असे चिन्ह दिसत आहे. त्यामुळे कंपनी कधी या चालकांवर कारवाई करते याकडे चिपळूणच्या जागृत जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.