पुरग्रस्त चिपळूण शहर आणि परिसराला मदतीचा आधार देण्यासाठी राष्ट्र सेवादल धावून आले असून , २२ जुलैच्या महाप्रलयानंतर अंधारमय झालेल्या पूरग्रस्तांना सेवादलाच्या रत्नागिरी सेवा पथकाने मातृमंदिरच्या सहकार्याने जीवनावश्यक वस्तूंचे मदत कीट पेठ माप येथील पुरग्रस्त जनतेला वाटले. ३० जणांच्या सेवादल पथकाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय चिखलमुक्त उपक्रम घेत २२ हजार पुस्तकांना जीवदान देण्याचा प्रयत्न केला. संपुर्ण चिखल पाण्यात बुडालेल्या ग्रंथालयाची स्वच्छता करण्यासाठी नवनिर्माण रत्नागिरी महाविद्यालयांच्या विद्यार्थांनी मोठ्या प्रमाणात मदत केली.
चिपळूण पुरग्रस्तांच्या मदतीला संपुर्ण महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर मदतकार्य सुरु असतांना, राष्ट्रसेवादल मिरज येथील इलेक्ट्रीकल दुरुस्ती पथकाने पुरग्रस्त भागातील अनेक घरे प्रकाशमान केली. चिपळूण येथील पूरजन्य परिस्थिती लक्षात घेता, सेवादलाचे वरीष्ठ पदाधिकारी सदाशिव मगदूम हे मिरज येथून २० जणांच्या पथकासह रत्नागिरीमध्ये दाखल झाले. या पथकातील इलेक्ट्रीयन आणि प्लंबर यांनी पुरग्रस्त भागात घराघरात जाऊन तेथील बंद पडलेले इलेक्ट्रीक कनेशक्शन्स, पाण्याचे पंप याची दुरुस्ती करत अनेक घरे पूर परिस्थितीत देखील ८ दिवसाच्या अंधारा नंतर प्रकाशमान झाली. तर घरात पीण्याच्या पाण्याचे अनेक मोटर पंप बंद झालेले त्यांची त्वरित दुरुस्ती करून पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली.
कोकणच्या पूरग्रस्त भागाला राष्ट्र सेवादलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आणि मदत पोहोचविण्याचे आवाहन केले आहे. अनेक स्तरातून सेवादलाच्या माध्यमातून मदतकार्य सुरु झाली आहेत. त्यात मिरज, येवले, पुणे, कोल्हापूर, मातृमंदिर देवरुख सेवादल, मुंबई, सेवादल मानवलोक आंबेजोगाई, आदी सेवादलाच्या विविध शाखा आणि संलग्न संस्थानी मोठ्या प्रमाणावर मदत केली आहे. इतर ठिकाणाहून अन्नधान्याचा पुरवठा होत असल्याने, राष्ट्र सेवादल चिपळूण कार्यकर्त्यांनी अन्न धान्य वगळता महिलांसाठी कपडे, अंतर्वस्त्र, चादरी, चटया इत्यादी अत्यावश्यक वस्तूंची नोंद केली आणि त्याची मदत मोठ्या प्रमाणावर वाटण्यात आली.