१८ ऑगस्ट २०२२ रोजी कोळकेवाडी धरणातील अवजल सोडण्याची चाचणी घेण्यात येणार असून, पुरनियंत्रणाचा एक भाग म्हणून ही चाचणी घेण्यात आली आहे. सकाळी १०.०० ते १२.०० यावेळेत २००० क्युसेक्स पाणी सांडव्यावरुन बोलादवाडी नाल्यातून वाशिष्ठी नदीत सोडून चाचणी घेण्याचे नियोजन आहे. या विसर्गामुळे धरण पायथा ते बोलादवाडी नाला हा जेथे वाशिष्ठी नदीस मिळतो यामुळे चिपळूणला निर्माण होणारी पूरस्थिती व विसर्ग याचे प्रमाण कोणता परिणाम करते याचा अभ्यास निरीक्षण आजच्या चाचणीत नोंदवले जाणार आहे.
पावसाळा कालावधीत कोळकेवाडी धरणातुन येणाऱ्या अवजलाच्या पाण्यामुळे चिपळूण शहरास पुराची भीती अधिक वाढते, यावर पावसाळा कालावधीत धरणातील पाणी सोडण्याचे नियोजन करण्यासंदर्भात उपाययोजना सुचविण्यासाठी अभ्यास गटाची स्थापना २० मे २०२२ च्या शासन निर्णयाद्वारे केलेली आहे. या गटाची तिसरी बैठक ०६ ऑगस्ट २०२२ ला पार पडली. या बैठकीत कोळकेवाडी धरणाचे वक्रद्वारे उघडून पाणी सांडव्यावरून बोलादवाडी नाल्यातून वाशिष्ठी नदीत सोडून चाचणी घेण्याचे निर्देशित करण्यात आले आहे.
या कालावधीत बोलादवाडी नाला काठावरील गाव कोळकेवाडी अंतर्गत जोशीवाडी, शिंदेवाडी, मंदार एज्यु. सोसायटीचे मागील बाजू, पायरवाडी, पठारवाडी, मौजे नागावे गावातील काठावरील वाड्या, मौजे अलोरे गावातील देवरेवाडी, सोनारवाडी, रोहिदासवाडी, मौजे पेढांवे सोसायटीजवळील मोजे खडपोली, सती, खेर्डी परिसरातील गावातील नागरिकांनी नदीपात्रात किंवा नदी किनारी देखील जाऊ नये, तसेच गुरे ढोरेही नदीपात्रात सोडू नये व जिवित व वित्त हानी टाळण्यासाठी सदर कालावधीत आवश्यक ती खबरदारी घेण्यात यावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रत्नागिरी यांनी कळविले आहे.