गेल्या वर्षी २२ जुलै २०२१ मध्ये झालेल्या अति वृष्टीमध्ये, दरड कोसळून पेढे कुंभारवाडीतील सहा घरे जमीनदोस्त झाली होती. व त्यामध्ये ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याने, तिघांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी चिपळूण पोलीस स्थानकात ठेकेदार कंपनी व महामार्ग विभागाचे अधिकारी अशा नऊ जणांवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयातील वकील ओवेस पेचकर यांच्या मार्गदर्शनाखाली पेढे ग्रामस्थांनी सुरू ठेवलेल्या लढाईला अभूतपूर्व यश मिळाले आहे.
चिपळूण पोलिसांनी रविवारी याबाबत गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची फिर्याद शशिकांत महादेव मांडवकर यांनी दिली होती. या फिर्यादीनुसार राष्ट्रीय महामार्गाचे काम पाहणारे महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीकांत बांगर, अमोल माडकर, कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर राजेश गर्ग, होल टाईम डायरेक्टर अमितकुमार गर्ग, ठेकेदार कल्याण टोल कन्फ्रास्ट्रक्चर लि. कंपनीचे तत्कालीन अधिकारी, संचालक टिकमचंद्र गर्ग, अंकित दिनेश चौरासिया, विवेक गोयल यांना सुरक्षितते संदर्भात न्यायालयाने प्रशासनाला गांभीर्याने पाहण्याची सूचना केली आहे.
ऍड. पेचकर यांनी पेढेतील सहा दरडग्रस्तांना न्याय देण्यासाठी व या घटनेला जबाबदार असणाऱ्या बेपर्वाह अधिकार्यांवर कारवाई व्हावी यासाठी पुढाकार घेतला. आणि विशेष म्हणजे चिपळूण न्यायालयात दरडग्रस्तांच्या वतीने कसल्याही प्रकारची फी न घेता त्यांनी निशुल्क केस लढविली होती. त्यामुळे सामजिक बांधिलकी जपत त्यांनी या पेढेतील दरडग्रस्तांना न्यायालयीन कामकाजामध्ये मदतीचा हात दिला आहे. सामाजिक भान जपणार्या ऍड. पेचकर यांच्या या कामाचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे.