पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पालकमंत्री उदय सामंत यांनी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाची पाहणी केली. पाच जुलैपर्यंत चिपळूण ते रत्नागिरीदरम्यानचे खड्डे भरण्यात येतील, असे आश्वासन दिले. विरोधकांनी टीका करण्यापूर्वी पालकमंत्री अॅक्शन मोडवर आले. मुंबई-गोवा महामार्ग गणेशोत्सवापूर्वी खड्डे मुक्त करण्याचे आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले आहे. पाच जुलैपर्यंत मोठे खड्डे भरण्याची सूचना त्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाला केली आहे. चिपळूण ते रत्नागिरीदरम्यानचा हा महामार्ग वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक झाला आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका आहे. काही ठिकाणी अपघाताचा धोका आहे. रस्ते खचण्याची भीतीसुद्धा वाहनचालकांमध्ये आहे. आरवलीपासून पुढे चौपदरीकरणाचे काम उशिराने हाती घेण्यात आले.
आरवली ते हातखंबादरम्यानचा एकेरी मार्ग पूर्ण झाला आहे. दुसऱ्या मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याचा मोठा धोका आहे. खेरशेत, आरवली, धामणी, कडवईफाटा, तुरळपासून अगदी हातखंब्यापर्यंत रस्ता चौपदरीकरणासाठी डोंगर फोडण्यात आले आहे. या ठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका कायम आहे. खड्यांमुळे रस्त्यावरून प्रवास करणे मोठे दिव्य ठरत आहे. दहा वर्षांचा इतिहास पाहता पावसाळी अधिवेशनामध्ये दरवर्षी विरोधक महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांचा विषय उचलून धरतात. त्यानंतर सार्वजनिक बांधकाममंत्री रायगडपासून सिंधुदुर्गपर्यंत रस्त्याची पाहणी करतात आणि तात्पुरते आश्वासन दिले जात होते.