राज्यातील वातावरण सध्या राजकारणातील बदलामुळे ढवळून निघाले आहे. चिपळूणचे ज्येष्ठ माजी नगरसेवक शिरीष काटकर यांनी पुढाकार घेत एका आगळ्या वेगळ्या सभेचे आयोजन केले आहे. चिपळूणकरांनी सर्व जाती धर्माचा सलोखा जपला आहे. त्यामुळे जाती धर्माचा एकोपा तसेच राजकारणाच्या पलीकडील संबंध जपले जावेत. यासाठी एक आदर्श घालावा आणि चिपळूणची संस्कृती अख्ख्या महाराष्ट्राला समजावी. इतरांनी त्याचा आदर्श घ्यावा. यासाठी शहरातील माधव सभागृहात गुरूवारी दि. २४ सांयकाळी ५ वाजता राजकारण विरहीत सर्वपक्षीय सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
सभेबाबत काटकर म्हणाले, सध्या राज्याचे वातावरण जे गढुळ झालेले आहे. हे कुठेतरी प्रत्येक महाराष्ट्र प्रेमीला नक्कीच खटकत असाव. परंतू आपल्या चिपळूणात आजपर्यंत जसे खेळीमेळीचे आणि सर्वांशी संबधित जे वातावरण राहीले आहे. ते तसेच रहावे. येथील कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून मर्यादेचे उल्लंघन आजपर्यंत झालेले नाही. ते वातावरण तसेच निकोप रहावे. यासाठी सर्व लोक प्रतिनिधींना एकाच व्यासपीठावर निमंत्रीत करण्यात आले आहे.
येथील विविध राजकीय पक्षात असलेले लोकप्रतिनीधी हे राजकारणात नीतीमत्ता बाळगणारे आहेत. एका व्यासपीठावर येऊन ते नक्कीच सर्वांसमोर एक आदर्श निर्माण करतील. याच कल्पनेने या सभेचे नियोजन करण्यात आले आहे. अशी सभा कुणीतरी घ्यायला हवी होती. त्याचे निमित्त मात्र शिरीष काटकर राहीले आहेत. त्यांनी संपूर्ण चिपळूणकरांच्या वतीने या सभेचे नियोजन केलेले आहे. सर्व चिपळूणकरांनी या सभेला उपस्थित राहावे. राजकारणातील सुसंस्कृत चिपळूणकर आणि सुसंस्कृत नेते हे चित्र कोकणला आणि महाराष्ट्राला दाखवून देऊया, असे आवाहनही त्यांनी केले आहे.