सध्या सगळ्याच क्षेत्रात मोबाईल फोनचा वापर वाढत चालला आहे. अगदी शेतीपासून ते बी-बियाणे खाते खरेदी विक्रीसाठी देखील आताचे शेतकरी मोबाईलचा वापर करु लागले आहेत. शेतकरी शेतमालाचे उत्पादन घेत असतात. परंतु त्याची विक्री करताना त्यांना असंख्य अडचणीचा सामना करावा लागत आहे. अशावेळी मध्यस्थांची मदत घ्यावी लागते, ज्यामध्ये त्यांना तोटा सहन करावा लागतो. परंतु आता स्मार्ट मोबाईलचा वापर करून शेतकरी आपल्या मालाची थेट विक्री करू शकतात.
मार्केट मिर्ची डॉट कॉम आणि डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यामध्ये मार्केट मिर्ची या मोबाइल ॲपचा वापर करून शेतमालाची खरेदी – विक्री कशी करावी याचे प्रशिक्षण देण्यात आले.
यासाठी मार्केट मिर्चीद्वारा “मेरा मोबाईल मेरा मार्केटिंग” ही संकल्पना या मोहिमेच्या मुख्य मार्गदर्शक प्रगती गोखले यांनी मांडली आहे. आय.आय.टी. मुंबईच्या मदतीने त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने त्या भारतात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देतात. मार्केट मिर्ची या अॅपचा वापर करून कोणीही आपल्या शेती आणि तत्सम उत्पादनाची विक्री करू शकतो. यासाठी कोणत्याही मध्यस्थाची किंवा कोणाला पैसे देण्याची गरज भासणार नाही.
याच मोहिमेचा भाग म्हणून कृषि विज्ञान केंद्र, किर्लोस (सिंधुदुर्ग), लांजा (रत्नागिरी), रोहा (रायगड) आणि विद्यापीठ मुख्यालय, दापोली (रत्नागिरी) येथे याबाबतच्या प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करण्यात आले होते. या पाच प्रशिक्षण वर्गांचा लाभ ३४५ शेतकरी, महिला, बचत गट सदस्य आणि विद्यार्थी यांनी घेतला. यामध्ये ओरोस-किर्लोस येथे ८३, लांजा येथे ६१, रोहा येथे ६७ तर दापोली येथे १३४ जण उपस्थित होते. शेतकऱ्यांनी वैयक्तिक पातळीवर न जाता एकत्रितपणे गटागटांच्या साह्याने याचा वापर करावा म्हणजे त्याचा जास्त फायदा होईल, असा सल्ला त्यांनी दिला. या सर्व प्रशिक्षण वर्गात सहभागी प्रशिक्षणार्थिनी आपल्या उत्पादनाच्या जाहिराती उत्तमप्रकारे तयार करून त्या ॲपवर अपलोड केल्या. त्यामुळे ते ॲप वापरणे किती सहज सोपे आहे ते लक्षात आले.