राज्यातील नवीन स्थापिलेले सरकार हे बाळासाहेबांच्या विचारांवर असून, सर्वांना योग्य कामासाठी, जनतेच्या विकासासाठी योग्य निधी उपलब्ध करून दिला जाईल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त करत हे सर्वसामान्यांचे सरकार आहे असे म्हटले. गेल्या १० दिवसांत आम्हाला भाजीवाला, रिक्षावाला अशी अनेक बिरुदावली लावण्यात आली, हिणवलं गेलं. परंतु, केंद्रातील मोदी सरकार बाळासाहेबांचा अजेंडा चालवत असल्याचं शिंदे यांनी म्हटले.
राज्यात नव्याने अस्तित्वात आलेल्या शिंदे फडणवीस सरकारने आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणा दरम्यान जोरदार फटकेबाजी केली. आभार भाषाणा दरम्यान, तरनवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धडाकेबाज भाषण केले. परंतु, त्यावेळीच शिंदे यांनी सामान्य नागरिकांना दिलासा देणाऱ्या दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत.
लवकरच पेट्रोल डिझेलवरील व्हॅट कमी करून सामान्यांना दिलासा देणार असल्याची ग्वाही दिली आहे. त्यामुळे नव्या सरकारच्या काळात सामान्य जनतेला दिलासा मिळणार असल्याचे शिंदे म्हणाले. त्याचप्रमाणे, शिंदे म्हणाले की, शिवसेनेचे मुख्य प्रतोद भरत गोगावलेंनी हिरकणी गाव वाचवण्याची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी संबंधित गाव वाचवण्यासाठी शासनातर्फे २१ कोटींच्या निधीची घोषणा केली.
जागतिक बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय कर कमी करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर देशातील काही राज्यांनी काही प्रमाणात व्हॅट कमी केला होता. मात्र, आपल्या राज्याने एक पैशानेही व्हॅट कमी केला नाही. परंतु, राज्यात नव्याने अस्तित्त्वात आलेले युतीचे सरकार लवकरच यावरील व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेईल आणि महागाईने त्रस्त सामान्य नागरिकांची पिळवणूक न करता नक्कीच दिलासा देण्याचं काम करेल, अशी ग्वाही शिंदे यांनी यावेळी दिली.