दहीहंडीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली. दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्यात आल्याचीही घोषणाही मुख्यमंत्री शिंदे यांनी केली आहे. तर राज्य सरकारच्या खेळाडूंना दिलेल्या ५ टक्के आरक्षणाचा लाभ नोकऱ्यांमध्ये गोविंदांनाही मिळणार असल्याचे त्यांनी त्यावेळी सांगितले.
गोविंदा आला रे आला या गीतांवर थिरकत जल्लोषात साजरा होणार्या दहिहंडीसाठी गोविंदा पथके सज्ज झाली आहेत. बदलत्या राजकीय समीकरणाचे प्रतिबिंब उत्सवात दिसणार आहे. अनेक ठिकाणी दहिहंड्यांना राजकीय स्वरूप आहे. जिल्ह्यात यंदा २५१ सार्वजनिक तर २ हजार ३३९ खासगी हंड्या उभारल्या जाणार आहेत. ८ ठिकाणी मिरवणुकीचे आयोजन केले आहे. कोरोना महामारीची दोन वर्षे झाल्यानंतर यंदा मोठ्या जल्लोषात दहीकाला साजरा होणार आहे. दहीहंडी उत्सवासाठी जिल्ह्यातील गोविंदापथकं सज्ज झाली आहेत. ग्रामीण आणि शहरी भागातील अनेक गोविंदा पथकांनी सराव केला आहे.
दहीहंडीच्या सणाला साहसी खेळाचा दर्जा द्यावा आणि त्या निमित्त शुक्रवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत केली. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्यात येत असल्याची घोषणा केली. दहीहंडी हा सण-उत्सव असला तरी त्यातील साहस आणि क्रीडा कौशल्य लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले. दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्यात येत असून, राज्य सरकारतर्फे वर्षभर प्रो-गोविंदा स्पर्धा भरवण्यात येईल,अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी विधानसभेत केली. तसेच गोविंदांना खेळाडूंसाठीच्या पाच टक्के कोटय़ातून सरकारी नोकऱ्यांसाठीही आरक्षण मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
स्पेन, चीनसारख्या देशांत पिरॅमिड म्हणून या प्रकाराचा खेळात समावेश झाला आहे. त्याच धर्तीवर आता महाराष्ट्रातही दहीहंडीसाठी गोविंदा पथकांकडून रचण्यात येणाऱ्या मानवी मनोऱ्यांच्या खेळाला साहसी खेळाचा दर्जा देण्यात येत आहे.