मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर असताना भाषणावेळी भाजपचा उल्लेख भावी सहकारी असा केल्याने नक्की मुख्यमंत्र्यांच्या मनामध्ये काय सुरु आहे याबाबत सुरु असलेल्या चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज-माजी पक्षाचे एकत्रित आले तर भावी सहकारी होतील असे म्हटलं असून त्यांनी एक प्रकारे भाजपला खुली ऑफर दिली असल्याची महाचर्चा सुरु आहे.
याबाबत भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे कि, राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं, मात्र सध्या मला तसं काही चिन्ह दिसत नाही आहे. मुख्यमंत्र्यांना या सरकारमुळे राज्याचे नुकसान होत असल्याचे कळून चुकले असावे म्हणून त्यांनी तसे वक्तव्य केलं असेल असा खोचक टोला सुद्धा त्यांनी लगावला. देवेंद्र फडणवीस यांनी पुढे म्हटलं आहे कि, मुख्यमंत्र्यांची जरी खुली ऑफर असली तरी आम्ही विरोधी पक्षात राहून जनतेची काम करणार आहोत. सध्या आम्ही सत्तेसाठी प्रयत्न करत नसल्याचे यांनी स्पष्ट म्हटलं आहे.
राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सुद्धा आपले मत प्रदर्शित केले आहे, ते म्हणाले कि, राजकारणात कुणीही कायमचा शत्रू नसतो, कुणीही कायमचा मित्र नसतो. त्यामुळे चमत्कार कधीही आणि काहीही होऊ शकतो, असं सूचक विधान विखे-पाटील यांनी केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा युतीच्या संकेतांच्या तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
काँग्रेस नेते नाना पटोल यांच्याशी माध्यमांनी विचारणा केली असता, पटोले म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना असे जोक करायची सवय आहे. भाजप सध्या तणावामध्ये आहे, म्हणून त्यांच्या समाधानासाठी मुख्यमंत्र्यांनी असे वक्तव्य केले असेल. त्यांच्या या वक्तव्यामागाचा अर्थ केवळ मुख्यमंत्रीच सांगू शकतील.