जिल्ह्यावर १९७२ पासून अगदी १९९० पर्यंत काँग्रेस पक्षाचे मोठे वर्चस्व होते. त्यानंतर काँग्रेसला जिल्ह्यात जी पडझड सुरू झाली ती ३५ वर्षे झाली ती थांबलेली नाही. पक्षांतर्गत कुरघोड्या, पक्षापेक्षा स्वतःला मोठे समजणारे नेते एकमेकाला कमी दाखवण्यासाठी उघड उघड भांडणारे गटतट यामुळे जिल्ह्यात काँग्रेसची वाताहत झाली. या राष्ट्रीय पक्षाला आता जिल्ह्यात अस्तित्व टिकवण्यासाठी झगडावे लागत आहे, हे राजकीय दुर्दैवच म्हणावे लागले. काँग्रेसचे नूतन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. त्यानिमित्त जिल्ह्यातील काँग्रेसच्या पडझडीचा घेतलेला हा आढावा. जिल्ह्यात १९७२ दरम्यान काँग्रेसच हा सर्वात मोठा पक्ष होता. जवळजवळ सर्व विधानसभा मतदारसंघावर काँग्रेस पक्षाचा मोठा पगडा होता. त्यानंतर जनता दल, भाजपने काँग्रेसच्या या बालेकिल्ल्याला पोखरायला सुरुवात केली. १९७८ पासून काँग्रेसची मक्तेदारी मोडित काढत जिल्ह्यात भाजप आणि जनतादलाने पाय पसरायला सुरवात केली.
काँग्रेसच्या शांताराम पेजे यांना भाजपच्या कुसुमताई अभ्यंकर यांनी १९७८ मध्ये पराभूत केले. त्यानंतर १९८० मध्ये काँग्रेसचे शिवाजीराव जड्यार यांचा कुसुमताई अभ्यंकर यांनी पराभव केला. रत्नागिरी, राजापूर, चिपळूण, दापोली मतदारसंघांत भाजप आणि जनतादलाने वर्चस्व निर्माण केले. त्यानंतर १९८५ पुन्हा काँग्रेसला शिवाजीराव जड्यार रत्नागिरी मतदारसंघातून आमदार झाल्यानंतर उभारी आली ती अगदी १९९३ पर्यंत; परंतु त्यानंतर जिल्ह्यात काँग्रेसची पडझड सुरू झाली.
शहराध्यक्षाच्या निवडीवरून वाद – जिल्ह्यात अॅड. सुजित झिमण जिल्हाध्यक्ष असताना रमेश कीर विरुद्ध झिमण असे गटातटाचे राजकारण सुरू झाले. कीरांनाही जिल्हाध्यक्ष म्हणून संधी मिळाली; परंतु ते काँग्रेसला उभारी देऊ शकले नाहीत. जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष आणि शहराध्यक्षाच्या निवडीवरून काँग्रेसमध्ये गट पडले. शहराध्यक्षाच्या निवडीमध्ये एवढा गोंधळ झाला की, दोन शहराध्यक्ष होते. नेमके शहराध्यक्ष कोण, असा प्रश्न उपस्थित होत राहिला. एका शहराध्यक्षाने कार्यालयाला कुलुप ठोकले. तालुकाध्यक्षाच्या निवडीवरूनही गोंधळ झाला. पक्षबांधणीसाठी काम करणारा कट्टर कार्यकर्ता पक्षाला मिळाला नाही. त्यामुळे सध्या काँग्रेस अस्तित्वासाठी झगडत आहे.