जगभरात आणि मुख्य करून दक्षिण अफ्रिकेमध्ये ऑमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा संसर्ग वाढत चालल्याने, चिंतेची बाब बनली आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची भीती असताना, आता कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठक आयोजित केली आहे. तर राज्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही जिल्ह्याचे अधिकारी, आरोग्य विभाग यांची तातडीची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीमध्ये संसर्ग वाढू बये यासाठी नव्या उपाय योजनांबाबत चर्चा करण्यात येणार आहे.
राज्यातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग आणि संख्या वाढवण्यासाठी राज्य सरकारकडून निर्बंध लागू करण्यात आले आहेत. प्रत्येक नागरिकाला कोरोना निर्बंधित लसीचे २ डोस घेणे बंधनकारक असणार आहे. लसीकरण वाढवण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. अद्यापही दोन लसींचा डोस घेतला नसलेल्या नागरिकांना आता सार्वजनिक वाहनाने प्रवासावरर निर्बंध घालण्यात आले आहेत.
दोन लसीचा डोस घेणाऱ्या नागरिकांनाच आता सार्वजनिक वाहनाने प्रवास करता येणार आहे. तसेच विनामास्क ग्राहकांना १० हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. राज्य सरकारने नव्या व्हेरीयंटच्या काळजीने सुरक्षिततेच्या कारणास्तव नवी नियमावली जाहीर केली असून कोरोना लसीकरण वाढवण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे.
त्याचप्रमाणे कोरोनाचे नियम न पाळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी हा निर्णय़ घेण्यात आला आहे. राज्य सरकारने कोरोना लसीकरणासाठी कडक नियमावली जाहीर केली आहे. त्यामध्ये सार्वजनिक वाहन, रिक्षा, टॅक्सीतून प्रवासादरम्यान प्रवाशाने मास्क घातला नसल्यास चालक आणि प्रवासी दोघांकडून प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. दुकानात ग्राहकाने मास्क घातला नसल्यास ग्राहकाला ५०० तर दुकानदाराला १० हजार रुपयांचा दंड ठोठवण्यात येणार आहे. मॉलमध्ये ग्राहकांनी मास्क घातला नसेल तर थेट मॉल्स मालकांवर ५० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. सभा, राजकीय क्रार्यक्रम, घरगुती कार्यक्रमांना परवानगी असेल परंतु नियमांचे उल्लंघन झाल्यास आयोजकावर ५० हजारांचा दंड आकारण्यात येणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये ३ ते ७ डिसेंबर दरम्यान भारत-न्यूझीलंड कसोटीमध्ये फक्त २५% प्रेक्षकांनाच परवानगी देण्यात येणार आहे.