रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या बाधितांच्या आलेखाला ब्रेक लागला असून, कोरोना बाधित रुग्ण कमी झाल्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. कोरोना काळामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये अनेक मनुष्यबळाची गरज भासली होती. परंतु, आता कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यावर कोरोना तपासणी केंद्रांवरील अनेक तंत्रज्ञाना कमी करण्यात आले आहे.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मात्र, संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुण्यासह एकूण १० जिल्ह्यांमधील तंत्रज्ञांना पुन्हा कामावर घेण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती दिली आहे. कोरोनाचे प्रमाण आटोक्यात आल्याने, अनेक ठिकाणी कोविड सेंटर्स बंद करण्यात आली आहेत.
तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता ती पुन्हा सुरू करण्यात येतील का ! असा सवाल करण्यात आल्यावर मंत्री सामंत यांनी सांगितले की, सद्याच्या घडीला रत्नागिरीतील बाधितांची रुग्णसंख्या घटली असून, रत्नागिरीत बाधितांची १०० पेक्षा कमी रुग्ण सापडत आहेत. म्हणजेच परिस्थिती अजून नियंत्रणाखाली आहे. पण जर रोज १५० पेक्षा जास्त रुग्ण सापडू लागले तर बंद करण्यात आलेली कोविड सेंटर्स पुन्हा सुरू करावी लागतील, अशी सूचना आपण जिल्हाधिकाऱ्यांना केली असल्याचे त्यांनी सांगितले.
रुग्ण आणि चाचण्या कमी झाल्यामुळे कोरोना तपासणी केंद्रांवरील अनेक तंत्रज्ञ कमी करण्यात आले होते. मात्र, तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे त्यांना पुन्हा कामावर घेण्याचा निर्णय झाला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे आणि अन्य काही अशा दहा जिल्ह्यांबाबत हा निर्णय घेण्यात आला असल्याचे नाम. सामंत म्हणाले.