चिपळूण शहरातील गंधारेश्वर रेल्वे ब्रिजवरून एका दापत्याने वाशिष्ठी नदीत उडी मारल्याने चिपळुणात खळबळ उडाली आहे. त्यांनी वाशिष्ठी नदीत उडी नेमकी का मारली? याचे कारण समजू शकले नाही. दरम्यान वाशिष्ठी नदीच्या पात्रात एनडीआरएफची टीम या दोघांचाही बुधवारी सायंकाळी उशीरापर्यंत शोध घेत होती. मात्र ते सापडले नव्हते. बुधवारी दुपारी घडलेल्या या प्रकारानंतर चिपळूण शहरात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. पोलिस सूत्रांनी याबाबत पत्रकारांना दिलेल्या अधिक माहितीनुसार, सौ. अश्विनी निलेश आहिरे (वय १९) व तिचा पती निलेश रामदास आहिरे (वय २६), सध्या चिपळूण तालुक्यातील पाग येथील रहिवासी असून, ते मूळचे धुळे जिल्ह्यातील आहेत. बुधवारी दुपारी दोघांनी रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या गंधारेश्वर ब्रिजवरून एकत्रितपणे वाशिष्ठी नदीत उडी मारली. पुलाजवळ या दोघांची दुचाकी उभी असल्याचे पोलीसांच्या निदर्शनास आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, कौटुंबिक व वैयक्तिक कारणामुळे हे पाऊल उचलले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, या संदर्भात तपास सुरू असून निश्चित कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
शोधकार्य सुरू – घटनेची माहिती मिळताच चिपळूण शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. तसेच प्रांताधिकारी आकाश लिगाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, तहसीलदार प्रवीण लोकरे यांनी घटनास्थळी भेट देऊन आढावा घेतला. तत्काळ एनडीआरएफ (राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक) यांना पाचारण करण्यात आले असून त्यांचे जवान दोघांचाही शोध घेत होते. सायंकाळी उशीरापर्यंत त्यांचा पत्ता लागला नव्हता.
बघ्यांची गर्दी – या घटनेमुळे गंधारेश्वर परिसरात नागरिकांची गर्दी झाली होती. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी नियंत्रण मिळवत शोध कार्यासाठी नदीकाठ सील केला. बुधवारी सायंकाळी उशीरापर्यंत दोघांचा शोध सुरू होता, मात्र त्यांचा ठावठिकाणा लागलेला नव्हता. दरम्यान, अश्विनी व निलेश यांचे काही दिवसांपूर्वीच लग्न झाले होते, अशी माहिती शेजाऱ्यांकडून समजते. दोघेही काही दिवसांपासून पाग येथे भाड्याने वास्तव्यास होते.
आत्महत्या तर नव्हे ? – या घटनेची माहिती संबंधित प्रशासन व महसूल विभागाला देण्यात आली असून, अधिक तपास चिपळूण पोलीस करत आहेत. त्यांनी आत्महत्या करण्याच्या उद्देशाने नदीत उडी मारली असावी, असा कयास वर्तविण्यात येत असला तरी अधिकृतपणे अजून काहीही स्पष्ट झालेले नाही.