परिवहन मंत्री अनिल परब यांनी, एसटी कामगारांचा संप मिटावा म्हणून एसटी संघटनांच्या प्रतिनिधींनी मला राज्याच्या महाधिवक्त्याशी चर्चा करायला सांगितलं आहे. मी महाधिवक्त्याशी चर्चा करण्यास तयार आहे परंतु, प्रथम एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, आणि जनसामन्यांचे होणारे हाल थांबवावे असं आवाहन करतानाच विलिनीकरणाची प्रक्रिया एक दोन दिवसात होणारी नाही. समितीचा अहवाल जेंव्हा येईल तो आल्यानंतरच त्यावर योग्य तो निर्णय घेता येईल, असे स्पष्ट केल आहे.
एसटीचे शासनामध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी गेल्या १४ दिवसांपासून आंदोलन करणारे एसटी कर्मचारी आता आक्रमक झालेले असून ते राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरावर मोर्चा काढण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. परब यांच्या घरावर मोर्चा काढणाऱ्या या मोर्चेकऱ्यांना सध्या आझाद मैदानावरच अडविलेलं आहे. त्याचप्रमाणे, अनिल परब यांच्या सरकारी निवासस्थानी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
आज एसटी संघटनेचे पदाधिकारी गुजर आणि अॅड. सदावर्ते यांनी अनिल परब यांची भेट घेऊन एसटी कामगारांच्या प्रश्नावर त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर मीडियाशी बोलताना परब यांनी हे आवाहन केलं. तुम्ही वकील आहात. तुम्हाला कायदेशीर प्रक्रिया माहीत आहे. कोर्टाने जी समिती स्थापन केली. तिला पूर्ण अधिकार दिले आहे. अभ्यास करून अहवाल सादर करावा. कोर्टाने निर्णय दिलेले असताना त्यामध्ये फेरफार करता येण शक्य नाही. समिती जो काही अहवाल देइल त्यावर आम्ही सकारात्मकपणेच निर्णय घेऊ असं मी त्यांना सांगितलं, असं परब म्हणाले.
यावेळी एसटी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अॅडव्होकेट जनरलशी बोलून घ्या असं सांगितलं. अॅडव्होकेट जनरल यांनाही या संपाची माहिती आहे. मी महाधिवक्त्याशी बोलेन पण तुम्ही संप घ्या. कारण लोकांची अडवणूक होते, त्यांना त्रास होत आहे. विलिनीकरणाची प्रक्रिया एक दोन तीन दिवसात होत नाही. त्यासाठी कमिटीला योग्य ती वेळ दिला आहे. त्या वेळेतच काम होईल. त्या व्यतिरिक्त काही मुद्दे असतील तर चर्चा करायला तयार आहे, असं मी त्यांना सांगितलं, असं त्यांनी स्पष्ट केलं.