राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे, सोमवार ४ ऑक्टोबरपासून सर्व शैक्षणिक संस्था सुरु होत असून, शहरी भागातील इयत्ता ८ वी ते १२ वी चे वर्ग आणि ग्रामीण भागातील इयत्ता ५ वी ते १२ वी चे वर्ग सुरू करण्यासंदर्भात राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने नुकतेच आदेश काढले आहेत. त्यानुसार शिक्षणाधिकारी यांच्या स्तरावरून तशा शाळांना सूचना देण्यात आल्या असून, बहुतांशी सोमवारपासून शाळा सुरू करण्याची तयारी सुरू झाली आहे.
मात्र, अद्याप रत्नागिरी शहरी भागातील काही शाळांमध्ये अजूनही लसीकरण केंद्र व तपासणी केंद्र कार्यान्वित असल्याने या शाळा कधी सुरू करण्यात येणार! असा प्रश्न पालक वर्गासमोर निर्माण झाला आहे. विशेष बाब म्हणजे सोमवारपासून शाळा सुरू होत असताना देखील अद्याप अनेक प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांच्या आणि शिक्षकेतर कर्मचार्यांच्या कोवीड ड्यूटीज सुरू आहेत.
यामुळे नक्की यांची हजेरी कुठे असणे प्रार्थनीय आहे ते स्पष्ट करणे गरजेचे आहे. जर कोविड ड्युटी असेल तर मग शाळेत कसे जायचे असा प्रश्न शिक्षकांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे शाळांमधील कोविड विषयक कामकाज व शिक्षकांना लावण्यात आलेल्या कोविड ड्युटी तात्काळ रद्द कराव्यात, अशी मागणी रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाच्या वतीने करण्यात आली असल्याचे जिल्हाध्यक्ष सागर पाटील यांनी सांगितले.
कारण जर शाळा सुरु होणार असतील तर, सर्व अभ्यासक्रम आणि इतरही अनेक जबाबदार्या शिक्षकांच्या खांद्यावर असतात. त्यामुळे अध्यापन, इतर कामे आणि कोविड ड्युटी यामध्ये त्यांची तारेवरची कसरत होते. त्यामुळे नक्की शिक्षकांनी अध्यापन करावे कि कोविड ड्युटी करावी हे स्पष्ट करण्यात यावे.