राज्यातील कोरोना नियंत्रणासाठी कोविड प्रतिबंधात्मक लस परिणामकारक कामगिरी बजावत आहे. त्यामुळे कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील जे अंतर ८४ दिवसांचा कालावधी आहे, तो कमी करण्यात यावा, अशी मागणी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपेनी, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांच्याकडे केली आहे.
राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांची काल निर्माणभवन येथे भेट घेतली. या भेटी दरम्यान राजेश टोपे यांनी राज्यातील परिस्थिती मनसुख मांडविया यांना कथन केली. यावेळी त्यांनी कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्यात यावे अशी मागणी केली.
इतर काही देशांमध्ये लसीकरणाच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्यात आले आहे. त्याप्रमाणे आपल्या देशातसुद्धा हा विचार व्हावा. परदेशी नोकरी अथवा शिक्षणासाठी जाणाऱ्या नागरिकांसाठी दोन मात्रांमधील अंतर कमी करण्यात आले आहे, त्याच प्रमाणे सामान्य जनतेसाठी देखील याचा विचार व्हावा, अशी विनंती राजेश टोपे यांनी मांडविया यांच्याकडे केली आहे.
तिसरी लाट येण्याची संभाव्य शक्यता लक्षात घेऊन आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविड लसीचा बुस्टर डोस देण्याबाबत देखील विचार करण्यात यावा. शैक्षणिक संस्था पूर्ववत सुरू होत आहेत, त्यामध्ये सुरक्षितता राहण्यासाठी १८ वर्षाखालील मुलांचे लसीकरण लवकरात लवकर सुरु करण्यात यावे, अशी आग्रही मागणीही यावेळी टोपे यांनी केली.
राज्यात सगळीकडेच कोरोना लसीकरण गतिमान पद्धतीने सुरु आहे. त्याला अजून वेग मिळण्यासाठी कोविशिल्ड लसीच्या दोन डोस मधील अंतर कमी करावे, अशी विनंती करत आहे. कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर ८४ दिवसांवरुन २८ दिवस करता येईल का ? याबाबत फेरविचार करावा, जेणेकरुन लसीकरणाला वेग येईल, असं मत राजेश टोपे यांनी व्यक्त केलं. त्याशिवाय कोरोनावर मात करण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या उपाययोजना, लसीकरणाच्या बाबतीत राज्याने केलेले उल्लेखनीय काम यासारख्या विविध मुद्यांबाबत सविस्तर माहिती दिली.