कोकण रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने शेकडो कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांच्या मदतीने मॉन्सूनपूर्व कामे पूर्ण केली आहेत. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या अडथळ्यांवर मात करण्याच्यादृष्टीने कोकण रेल्वेमार्गावरील भौगोलिक कामांसाठी ३४ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आल्याची माहिती कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांनी दिली. रेल्वेमार्गावर दरडी कोसळण्याच्या घटनांमध्ये सर्वाधिक घट झाल्याचेही स्पष्ट केले. गणेशोत्सवात लाखोंच्या संख्येने चाकरमानी डेरे दाखल होतात. गणेशोत्सवासाठीचे बुकिंग अवघ्या काही तासांत हाऊसफुल्ल होते. उत्सव काळात चाकरमान्यांच्या मार्गात कोणत्याही प्रकारचे “विघ्न” येऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेतली आहे.
चाकरमान्यांच्या सुखकर प्रवासासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने मॉन्सूनपूर्व कामावर सर्वाधिक भर दिला आहे. मार्गावरील बोगद्यांची पाहणी करत देखभाल दुरुस्तीची कामे पूर्ण केली. पावसाची नोंद सांगणारे पर्जन्यमापकही बसवण्यात आल्याचे सांगण्यात आले. पूरसदृश परिस्थितीत आवश्यक माहिती देण्यासाठी पूरमापक यंत्रणाही बसवण्यात आली आहे. वाऱ्याचा अचूक वेग मोजण्यासाठी अॅनिमोमीटर्सही बसवण्यात आले आहेत. मागील १० वर्षांत दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये कमालीची घट झाली आहे. कोकण मार्गावर तत्परतेने अन् कार्यक्षम पद्धतीने कामे पूर्ण करण्यावर प्राधान्य देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
चाकरमान्यांकडून समाधान – कोकण रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी युद्धपातळीवर मॉन्सूनपूर्व कामे पूर्ण केली आहेत. त्यासाठी तब्बल ३४ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. बोगद्यांची देखभाल दुरुस्ती प्रामुख्याने केल्याने गणेशोत्सवात कोणत्याहीप्रकारचे विघ्न येणार नाही याची काळजी कोकण रेल्वेने घेतली आहे. त्याचबरोबर पर्जन्यमापक बसवण्यात आल्याने संभाव्य पावसाची नोंदीची माहितीही मिळणार आहे. त्याआधारे वेळीच उपाययोजना करता येणे शक्य होणार आहे. या माध्यमातून चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होण्यास मदत मिळणार आहे.