तालुक्यातील “गणपतीपुळे येथे पर्यटकांची तोबा गर्दी केली आहे. दीड ते दोन किमीच्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे; परंतु जयगड सागरी पोलिस व गणपतीपुळे पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. समुद्रात खोल पाण्यात जाण्यास मज्जाव केला जात आहे. मुंबईसह पाचव्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचे मतदान झाले आहे. त्यानंतर शनिवार, रविवार सुटी असून संकष्टी चतुर्थी आहे. त्यामुळे राज्यातील ठिकठिकाणाहून गणपतीपुळेत भाविक आणि पर्यटकांचे अक्षरशः उधाण आले आहे.
गर्दीमुळे कोणताही अनुचित प्रकार घडु नये यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आदी भागातून येणाऱ्या पर्यटकांना समुद्राचे प्रचंड आकर्षण असते. ते पोहण्याचा मोह टाळू शकत नाही. काहीवेळा अतिउत्साह जीवावर बेततो. अशांना पोलिस आणि देवस्थानच्या गार्डकडून सूचना देऊन खोल समुद्रात जाण्यास मज्जाव करण्यात येत आहे.
गणपतीपुळे रत्नागिरी, गणपतीपुळे सागरीमार्ग, गणपतीपुळे जयगड खंडाळा या प्रत्येक नाक्यावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे तसेच सागरीरक्षक यांना सुद्धा मार्गदर्शन केलेले आहे. पर्यटकांनी पाण्यात पोहण्यासाठी जाऊ नये, गाड्या पार्किंग व्यवस्थित ठेवण्यासाठी यासाठी वारंवार सूचना देण्यात आल्या आहेत. गणपतीपुळेपासून जवळजवळ दोन किमीच्या गाड्यांच्या रांगा लागल्या आहेत.