पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाने बारसू गावात केलेल्या आतापर्यंतच्या सर्वे क्षणात ६२ कातळशिल्पांची बारसूच्या सड्यावर नोंद केलेली आहे. बारसू येथील कातळशिल्पे असलेली जमीन प्रस्तावित तेलशुद्धीकरण प्रकल्पाच्या भूसंपादन प्रस्तावातून वगळण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री ना. सुधीर मनगंटीवार यांनी दिली आहे. याचा अर्थ कातळशिल्प वगळून रिफायनरी प्रकल्प मार्गी लावणार असा काढला जात आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पावसाळी अधिवेशनात बारसू येथील कातळशिल्पांच्या संवर्धनाबाबत तारांकीत प्रश्न मांडला होता. प्रस्तावित तेलशुध्दीकरण प्रकल्पामुळे बारसूच्या सड्यावरील सुमारे १७० कातळशिल्पे धोक्यात आली आहेत.
या कातळशिल्पांच्या जतन आणि संवर्धनासाठी राज्य सरकारने कोणती उपाययोजना केली? असा प्रश्न दानवे यांनी केला. या प्रश्नाच्या लेखी उत्तरात मंत्री मुनगंटीवार यांनी बारसूच्या सड्यावर ६२ कातळशिल्पांची नोंद करण्यात आल्याचे नमूद केले. तसेच, रत्नागिरी जिल्ह्यातील १७ ठिकाणच्या कातळशिल्पांचे जतन, संवर्धनाचे काम निविदास्तरावर असल्याचेही स्पष्ट केले. तसेच, रत्नागिरी जिल्ह्यातील सात, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक आणि गोवा राज्यातील फणसाईमाळ अशी एकूण नऊ ठिकाणची कातळशिल्पे यूनेस्को च्या वारसास्थळांच्या तात्पुरत्या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. यामध्ये बारसू येथील तीन कातळशिल्पांचा समावेश असल्याचेही मंत्री मुनगंटीवार यांनी आपल्या उत्तरात नमूद केले आहे.