रत्नागिरीतील मंडणगड तालुक्यातील पणदेरी धरणाच्या मुख्य भिंतीमध्ये तळाच्या मुखाशी गळती सुरु झाल्याचे वृत्त प्रशासनाला समजताच प्रशासन त्रावित गळती बुजवण्यासाठी सक्रीय झाले आहे. खबरदारी म्हणून मंडणगड तहसीलदार आणि पोलीस यांच्या उपस्थितीमध्ये ग्रामस्थांना स्थलांतरित करण्याचे काम सुरू आहे. या धरणा शेजारी पंधरा गावे असून धरणाच्या पायथ्याशी जवळपास सहा वड्या असल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात. मात्र असं असलं तरी नागरिक स्थलांतरास किती प्रतिसाद देतात याचा अंदाज सध्या प्रशासनकडून घेणे चालू आहे.
जिल्हा कॉंग्रेसचे जनरल सेक्रेटरी जमीर माखजनकर यांनी प्रशासनाकडे या धरणाच्या बाबतीतील विविध समस्यांच्या बाबतीत तक्रार देऊन, सतत पाठपुरावा केला असून, अनेकदा पत्रव्यवहार देखील केले आहेत, या धरणासाठी करोडो रुपये खर्चून देखील स्थानिक शेतकऱ्यांसाठी त्याचा काहीही उपयोग झालेला नाही असे त्यांनी सांगितले.
यंदाच्या हंगामातच या धरणाच्या डागडूजीचे काम करण्यात आले होते. धरणाच्या भिंतींचे मजबुतीकरण करण्याचे काम करण्यात आले होते, परंतु आता झालेल्या गळतीवरून ते काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे सिद्ध झाले आहे असा अनेक ग्रामस्थांनी आरोप केला आहे. गळती झालेल्या ठिकाणी पिचिंग करण्याचे काम वेगाने सुरु आहे. पोत्यात माती भरून, त्याचा भराव करण्यात येत आहे. धरण पूर्ण भरले असल्याने पाण्याचा जास्त प्रमाणामध्ये दाब जाणवत आहे.
परिसरातील पणदेरी बौद्धवाडी, कोंडगाव, रोहिदासवाडीमधील ग्रामस्थांचे उंचावरील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि प्राथमिक शाळेमध्ये स्थलांतर करण्यात आल्याची माहिती तहसीलदार वेंगुर्लेकर यांनी दिली आहे. तसेच प्रशासनाने गळतीचे प्रमाण पाहून पुढील निर्णय घेण्यात येईल असे सांगतिले आहे, असे असले तरी खबरदारी म्हणून येथील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन देखील करण्यात येत आहे.