रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी विविध प्रकारची रस्ते डागडुजी, दुरुस्तीची कामे सुरु आहेत. त्यामुळे वाहनचालक मोठ्या प्रमाणांत जबाबदारीने वाहन चालवताना दिसत आहेत तर काही ठिकाणी मात्र परिस्थिती संपूर्ण उलटी आहे. दुचाकी बेदरकारपणे चालवून स्वत:च्याच मृत्यूला वाहनचालक जबाबदार ठरला आहे. दापोली केळस्कर नाका येथील आसरा पुलाजवळ दुचाकी स्लिप होऊन झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेंद्र रामचंद्र मळेकर वाय ४३, रा. रविकिरण अपार्टमेंट, उद्यमनगर, दापोली हे आपल्या ताब्यातील दुचाकी घेऊन आर्थिक हॉटेल ते रुपनगर दापोली असा प्रवास करत होते. सर्वच अंतर्गत रस्त्यांवर सुद्धा छोट मोठ काम सुरु आहे. त्यामुळे वेगावर नियंत्रण न ठेवता, बेदरकारपणे गाडी चालवल्यामुळे केळस्कर नाका आसरा पुलावर त्यांची गाडी स्लिप झाली. आणि यामध्ये त्यांच्या डोक्याला जबरी मार लागल्याने त्यांचा मृत्यू ओढवला.
याबाबतची फिर्याद पोलीस हवालदार संदीप गुजर यांनी दापोली पोलीस स्थानकात दिली. त्यानुसार दुचाकी स्वार महेंद्र मळेकर यांच्या विरोधात भादवी कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८ मोटर वाहन कायदा कलम १८४, १४६/ १९६ नुसार २० जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पड्याळ करत आहेत.
पोलिसांमार्फत वारंवार वाहने सावकाश चालवा, अपघात टाळा अशा सूचना देऊन देखील अनेकजण बेफान वाहन चालवून स्वत:सह समोरच्याला सुद्धा दुखापत पोहोचवतात. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याने पोलीस त्यांच्यावर कारवाई सुद्धा करतात. त्यातून बोध घेऊन काही वाहनचालक आपल्यामध्ये सुधारणा घडवून आणतात तर काही मात्र जैसे थे. त्यामुळे अशा प्रकारचे अपघात घडून, जीवास मुकावे लागते.