खरी शिवसेना नक्की कुणाची” या चिन्हावरील सुरु असलेल्या वादावरून, हे सिद्ध करण्यासाठी उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे गटाचा “दसरा मेळावा” युद्धासाठी कोकण, मराठवाडा आणि विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह राज्यभरातून हजारो वाहने आणि लाखो कार्यकर्त्यांना मुंबईला नेले जात आहेत. अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपलेल्या या मेळाव्याची जंगी तयारी दमदारपणे सुरु करण्यात आली आहे. यात सत्ताधारी एकनाथ शिंदे गटाने ठाकरे गटाच्या तिप्पट नियोजन केले असल्याचे सांगितले जात आहे.
मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्ट्रातून ठाकरे गटाने सुमारे १,७९२ वाहनांची व्यवस्था केली असून ६० हजार शिवसैनिक मुंबईला नेण्यात येत आहेत. तर शिंदे गटाने तिप्पट म्हणजे ५,१५१ वाहनांची व्यवस्था केली असून ते पावणेदोन लाखांहून अधिक कार्यकर्ते मुंबईला नेण्याचा दावा केला आहे. इतकेच कार्यकर्ते प. महाराष्ट्र व कोकणातून येण्याची शक्यता आहे.
दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्याबाबतचा न्यायालयीन तिढा सुटल्यानंतर ठाकरे गटाकडूनही शक्तिप्रदर्शनासाठी जोरदार तयारी केली जात आहे. मेळाव्यासाठी संपर्कप्रमुखांसह जिल्हाप्रमुखांवर गर्दी जमवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शिवाजी पार्क आणि बीकेसीतील एमएमआरडीए मैदानात दोन्ही गटाकडून जय्यत तयारी केली जात आहे.
न भूतो न भविष्यती असा कायम सगळ्यांच्या लक्षात राहील असा आपला दसरा मेळावा भव्यदिव्य करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी सर्व शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. त्यांचे स्वीय सचिव तथा शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, खासदार विनायक राऊत, अनिल देसाई यांनी शिवाजी पार्कवरील तयारीचा नुकताच आढावा घेतला असून; तर दुसरीकडे बीकेसीच्या एमएमआरडीए मैदानातही शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी जोरदार चुरस निर्माण झाली असल्याचे चित्र दिसून येत आहे.