तालुक्यातील दाभोळ खाडीत रासायनिक दूषित पाणी सोडल्याने मासे मृत झाल्याची घटना समोर आल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पंचनामे केले असून, मृत मासे, पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. याबाबत दाभोळ खाडी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मंडळाच्या अधिकाऱ्यांकडे सतत पाठपुरावा केला आहे. दाभोळ खाडीत वेगवेगळ्या प्रकारची मासळी मुबलक प्रमाणात मिळू लागली असतानाच गेल्या दोन दिवसांपासून खाडी मृत मासे पाण्यावर तरंगत असल्याची घटना समोर आली आहे. यामुळे खाडी परिसरातील मच्छीमार बांधव धास्तावले आहेत.
या घटनेची आमदार शेखर निकम यांनी तत्काळ दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मेलद्वारे निवेदन दिले. चिपळूणसह गुहागर, दापोली, खेड या चार तालुक्यांत दाभोळ खाडी सामावलेली आहे. चिपळूण तालुक्यातील गोवळकोट ते गुहागर तालुक्यातील अंजनवेलदरम्यान खाडीकिनारी भोई समाजाची एकूण ४२ गावे वसलेली आहेत. या समाजाचा पारंपरिक व्यवसाय मासेमारी आहे. या खाडीत दूषित पाणी सोडल्याने खाडीतील मासे मृत होत असल्याचे येथील ग्रामस्थांचे मत आहे. भोई समाजाचा मासेमारी हा पारंपरिक व्यवसाय धोक्यात येऊन त्यांचेवर उपासमारीची परिस्थिती उद्भवत आहे.
चिपळूण तालुक्यातील केतकी भोईवाडी येथील खाडीतील मासे मृतप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी ग्रामस्थांच्यासमवेत पाहणी केली असता भिले, सोनगाव, कोतवली, गोवळकोट, धामणदेवी, सोनगाव, भिले, केतकी, कोतवली, मेटे, आयनी, बहिरवली, तुंबाड, शिर्शी, शिव पन्हाळजे, होडखाड, मालदोली, चिवेली, दाभोळखाडी लगतची सर्व गावे प्रदुषणामुळे बाधित झाली आहेत, असे त्यांच्या निदर्शनास आले आहे. खाडीत मिळणारे रेणवी कालचडू, चित्ताडा, पालू, बोय, तांबुस खरबा आदी मासे मृत झाले आहेत. संबंधित विभागाने त्या वेळी पाणी व मृत माशांचे नमुने संकलित केले आहेत. दरम्यान, याबाबत सखोल चौकशीची मागणी आमदार निकम यांनी केल्यामुळे हे प्रकरण गांभीर्याने घेतले जाईल, अशी आशा आहे.