तालुक्यातील अनेक ठिकाणी हळूहळू पाण्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पाण्याचा साठा करण्याकडे लोकांचा कल दिसून येत आहे. पाण्याच्या सुविधेसाठी शासनाच्या मदतीवर अवलंबून न राहता, गाळ उपसा करणे, बंधारा बांधणे यासारख्या गोष्टी सध्या लोक सहभागातून करताना दिसून येत आहे.
देवरूख येथे सप्तलिंगी नदीवर सावरकर चौक मित्रमंडळ व देवरूख महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभाग यांच्या वतीने वनराई बंधारा उभारण्यात आला आहे. या उपयुक्त उपक्रमाचे देवरुख वासीयांकडून कौतुक होत आहे. देवरूख व पाटगाव यांच्या सीमेवर असलेल्या पुलाजवळ सप्तलिंगी नदीवर वनराई बंधारा बांधण्यात आला आहे. जेणेकरून पाणी साठा वाढविण्यात यश येईल.
बंधारा उभारण्यासाठी सकाळी ८.३० वाजता प्रारंभ झाला. ही मोहीम दुपारी १२ वाजेपर्यंत सुरू होती. या मोहिमे दरम्यान तब्बल ४० फूट लांब व २ फूट उंचीचा वनराई बंधारा बांधण्यात आला आहे. हा बंधारा उभारण्यासाठी सिमेंटच्या पिशव्या, वाळू, मातीचा वापर करण्यात आला आहे. बंधारा उभारल्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे.
या सामाजिक उपक्रमासाठी सुदेश साळवी व देवरूख नगरपंचायतीचे विशेष सहकार्य लाभले. या मोहिमेत निवृत्त कृषी अधिकारी हेमंत तांबे, पाटगाव सरपंच विजय कुंभार, उपसरपंच देवेंद्र गवंडी, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सुनील सोनवणे, सीमा शेट्ये, अभिनय पातेरे, माजी सैनिक चंद्रकांत चाळके, सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते, रेवा कदम, डॉ. सुनील दैठणकर, वकील चंद्रकांत मांगले, डॉ. शरद पोतदार, ब्रह्मकुमारी प्रजापतीच्या माधवी दिदी, ग्रामसेवक सार्थक नलावडे, सावरकर चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष राजु वणकुंद्रे यांसह सुमारे ७० विद्यार्थी स्वयंसेवक सहभागी झाले होते. त्यांच्याच पूर्ण सहकार्याने हा वनराई बंधारा बांधण्यात आला आहे.