जिल्ह्यात महामार्ग आणि अंतर्गत रस्ते यांवर दिवसेंदिवस होणाऱ्या अपघाताच्या मालिकामध्ये वाढच होत आहे. रोज एक दोन तरी लहान मोठे अपघात झालेले पहावयास मिळत आहेत. यांमध्ये काही जणांना रात्याचा न आलेला अंदाज, चालकाला झोप अनावर होणे, समोरचा चालकाने हुलकावणी देणे, वाहनावरचा ताबा सुटणे इत्यादी अनेक गोष्टींमुळे अपघात होत असतात.
देवरुख रत्नागिरी मार्गावर वेगात असलेली मारुती स्विफ्ट डिझायर कार पलटी होऊन झालेल्या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला. हा अपघात काल, गुरुवारी मध्यरात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास पाटगाव येथे घडला. दीपिका दीपक सावंत वय-५० आणि भागीरथी दगडू सावंत ८५, रा. माळवाशी मावळत वाडी अशी या मृत महिलांची नावे आहेत. घरातील महिला अशा प्रकारे मृत्युमुखी पडल्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
वाशी तर्फे देवरुख येथे शुक्रवारी मंदिराचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमासाठी सावंत कुटुंबीय मुंबईतील वाशी येथून आपल्या घरी येत होते. मध्यरात्रीच्या सुमारास त्यांची गाडी पाटगाव घाटीच्या पुढे हॉटेल हिल पॉईंट येथे आली असता चालकाचा कारवरील ताबा सुटून ती उलटली. गाडी वेगात असल्याने यात सासू आणि सून या दोघीचा मृत्यू ओढावला आहे.
कारमधून चारजण प्रवास करीत होते. त्यांना घरी पोहचण्यासाठी केवळ अडीच ते तीन किलोमीटर एवढाच प्रवास करायचा बाकी होता. त्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर घाला घातल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. अपघाताचे वृत्त कळताच देवरुख पोलीस स्थानकाचे निरीक्षक जाधव यांनी घटन्स्थाली जाऊन पंचनामा केला. अधिकचा तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक पवार करत आहेत.