जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकाचे मासेमारी बंदर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हर्णै बंदरामध्ये डिझेल तस्करांची मोठी साखळी दापोली पोलिसांनी उघडकीस आणली. मासेमारी नौकेतून अवैधरीत्या विक्रीसाठी आणलेला सुमारे ३० हजार लिटर डिझेलसदृश द्रवपदार्थ नौकेसह जप्त केला. त्याची किंमत सुमारे ४७ लाख ६२ हजार ५०० रुपये असून, याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती दापोली पोलिसांनी दिली. याबाबत दापोली पोलिसांनी दिलेली माहिती अशी, हर्णे बंदर येथे मासेमारी नौकेतून अवैधरीत्या विक्रीसाठी डिझेलसदृश द्रवपदार्थ आणला असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार रविवारी (ता. १५) सायंकाळी ५ वाजता पोलिस पथकाने हर्णे बंदर येथे धाव घेतली. तिथे त्यांना सुफी नाव असलेल्या व एमएच ७ एमएमएम २८८ हा क्रमांक असलेली मासेमारी नौका आढळली.
या नौकेची तपासणी केली असता नौकेच्या १४ खणांमध्ये सुमारे ३० हजार लिटर डिझेलसदृश द्रवपदार्थ आढळले. याच नौकेवर हा द्रवपदार्थ काढण्यासाठी एक सक्शन पंपही आढळला. याप्रकरणी संशयित वामन पोशिराम रघुवीर (रा. हर्णे), हातीन केसरीनाथ कोळी (वय ३४) व दर्शन अनंत कोळी (३५, दोन्ही रा. बोडणी, रेवस, ता. अलिबाग), संदीपकुमार मिठाईलाल मिसाद (३२) व शिव्य प्रमोद मिसाद (१९, रा. झापराबाद, जोनपूर-उत्तरप्रदेश) यांच्याविरोधात विनापरवाना डिझेलसारख्या जीवनावश्यक व ज्वालाग्राही पदार्थाची कोणतीही योग्य ती खबरदारी न घेता मानवी जीवितास धोका उत्पन्न होईल, अशा प्रकारे हाताळणी, साठवणूक व वाहतूक केल्याप्रकरणी दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही तक्रार उपनिरीक्षक दत्ता पवार यांनी दापोली पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.
कारवाईत पोलिस उपअधीक्षक आवटी, पोलिस निरीक्षक विवेक अहिरे, उपनिरीक्षक राजकुमार यादव, दत्ता पवार, हेडकॉन्स्टेबल श्री. सडकर, पंकज पवार, विकास पवार, सुहास पाटील, सूरज मोरे सहभागी झाले होते. सर्व संशयितांवर भारतीय न्यायसंहितेच्या कलम २८७, ३(५) सह अत्यावश्यक वस्तू अधिनियमानुसार गुन्हा दाखला पर करून नोटीस बजावली आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक विवेक आहिरे करीत आहेत.
डिझेल तस्करीसाठी किनारपट्टीचा वापर – मिऱ्या समुद्रकिनारी भरकटलेल्या का जहाजामधूनही मोठ्या प्रमाणात ऑईलची वाहतूक केली जात होती. बंदी पडलेले ह जहाज मिऱ्या समुद्रकिनारी लागल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. चार वर्षे होऊन गेली तरी हेड्य जहाज किनाऱ्यावरच अडकलेले आहे. त्यात मच्छीमारी नौकांमधून अशा प्रकारे डिझेलची चोरटी वाहतूक होत असेल तर रत्नागिरी किनारपट्टीचा डिझेल तस्करीसाठी वापर होत नाही ना, असा संशय आता व्यक्त केला जात आहे.