गणेशोत्सवासाठी मध्यरेल्वेने जाहीर केलेल्या दिवा चिपळूण आणि दिवा-खेड या दोन ८ डब्यांच्या अनारक्षित मेमू रेल्वेगाडीवरून कोकणात नाराजी व्यक्त केली जात आहे. कोकण विकास समितीने या गाड्यांचा लाभ फक्त मर्यादित प्रवाशांनाच होणार असल्याचे सांगत, मध्यरेल्वेला २४ डब्यांच्या पारंपरिक लोको-हॉल्ड रेकसह या गाड्या दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, वांद्रे टर्मिनस किंवा बोरिवली येथून चालवण्याची मागणी केली आहे. समितीच्या म्हणण्यानुसार, परळ, दादर, माहीम, अंधेरी, गिरगाव, लालबाग, सांताक्नुज, बोरिवली, भाईंदर, वसई, ठाणे आणि घाटकोपर परिसरातील लाखो चाकरमानी प्रवाशांना पनवेल किंवा दिवा येथे पोहोचणे गैरसोयीचे ठरते. त्यामुळे घोषित केलेल्या मेमू गाड्यांचा प्रत्यक्ष लाभ फार कमी प्रवाशांना मिळेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
८ डब्यांच्या मेमू गाड्यांवर आक्षेप घेत गणेशोत्सवातील प्रचंड गर्दी पाहता केवळ ८ डब्यांच्या मेमू गाड्या देणे, हा अप्रस्तुत आणि असमर्थनीय निर्णय असल्याचे कोकण विकास समितीने म्हटले आहे. खेळण्यातील गाडीप्रमाणे दिलेल्या या गाड्या गर्दीवर किती नियंत्रण मिळवणार? हा संशोधनाचा विषय असल्याचेही पत्रात नमूद केले आहे. त्यात अनारक्षित डब्यांची समस्या भेडसावत असताना संपूर्ण अनारक्षित गाड्यांमध्ये आरक्षणाची कोणतीही हमी नसल्यामुळे पुढील स्थानकांवरील प्रवाशांना जागा मिळत नाही. यामुळे गाड्यांची संख्या वाढलेली दिसत असली तरी त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळत नाही, असे समितीने निदर्शनास आणले आहे.