राज्य शासनाने दिवाळी साठी लागणारा शिधा वस्तू १०० रुपयात उपलब्ध करून देऊन सर्वसामान्यांची दिवाळी गोड करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या गरिबांच्या आनंदाच्या शिधामधील ४ वस्तूंपैकी तेल आणि साखर काही प्रमाणात पुरवठा विभागाकडे प्राप्त झाला आहे. मात्र चणाडाळ, रवा याची अजून प्रतीक्षाच आहे. जिल्ह्यात २ लाख ७५ हजार लाभार्थी आहेत.
भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नवीन सरकारने गरिबांची दिवाळी गोड करण्यासाठी हे शिधा पॅकेज जाहीर केले. जिल्ह्यातील २ लाख ७५ हजदार ८५७ लाभांर्था शासनाच्या अन्न सुरक्षा योजनेचा लाख घेत आहेत. यात अंत्योदय रेशनकार्डधारकांची संख्या ३८ हजार ७०० आहे. प्राधान्य गटातील लाभार्थ्यांची संख्या २ लाख ३७ हजार आहे. शासनान ४ ऑक्टोबरला १०० रुपयामध्ये चार वस्तू दिवाळी भेट देण्याचा निर्णय घेतला. रवा, चणा डाळ, साखर आणि पाम तेल अशा त्या वस्तू असून प्रत्येक रेशन दुकानावर त्या मिळणार आहेत.
शासनाकडून ही दिवाळी भेट असल्याने चारही वस्तू एकत्रित पॅकबंद मिळणार आहेत. मात्र दिवाळी एका दिवसावर आली तरी रेशनदुकानांवर या चार वस्तू पोहचलेल्या नाहीत. रवा, तेल, साखर आणि चणाडाळ शंभर रुपयात देण्याची घोषणा सरकाराने केली. मात्र गरीबांच्या आनंदाचा शिधा केवळ अर्धाच पोहचला आहे. तेल, साखर आहे तर चणाडाळ आणि रव्याचा पत्ता नाही, अशी अवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे अर्ध्या सामानात दिवाळी कशी गोड होणार असा गहन प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे.