रत्नागिरी नगर परिषदेतर्फे कोविड योद्धांचा मंगळवारी सत्कार उद्योजक अण्णा सामंत यांच्या उपस्थितीत पार पडला. रत्नागिरी नगर परिषदेने आयोजित केलेल्या या गौरव समारंभाला नगराध्यक्ष बंड्या साळवी, आरोग्य समिती सभापती निमेश नायर, ज्येष्ठ नगरसेवक राजन शेट्ये, नगर सेविका स्मितल पावसकर यांच्यासह इतर नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते.
कोरोना काळात स्वत:च्या जिवाची पर्वा न करता, काम करणार्यांचा सत्कार करणे हे आमचे परम कर्तव्य आहे, असे नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी सांगितले. त्या धोकादायक परिस्थितीमध्ये केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. नगराध्यक्षांनी कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी दफनभूमीत कार्यरत असणाऱ्या नगरसेवक मुसा काझी यांचेही विशेष कौतुक केले.
या महामारीच्या भयंकर काळामध्ये सत्कारमूर्ती डॉक्टरांसह, रनप पदाधिकारी, नगरसेवक, कर्मचारी आणि सामाजिक संस्था यांनीही मोठ्या हिरीरीने सहभाग नोंदवत उत्कृष्टपणे काम बजावले. केलेल्या चांगल्या कामाचे कौतुक करण्यासाठी रनपने सत्काराचे आयोजन केले आहे. सदर कार्यक्रमाला कॅबिनेटमंत्री उदय सामंत उपस्थित राहणार होते, परंतु अचानक लागलेल्या कॅबिनेट मिटींगमुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत, याची माहिती अण्णा सामंत यांनी दिली.
कोरोना संकटकाळात रुग्णसेवा करणे पुण्याचे काम आहे. हे पुण्यकार्य वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले. त्यामुळे तुम्ही केवळ देवदूतच नव्हे, तर प्रत्यक्ष देवच आहात, असे गौरवोद्गार उद्योजक आणि समाजसेवक रवींद्र ऊर्फ अण्णा सामंत यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांप्रती काढले.
त्याचप्रमाणे, रत्नागिरी नगरपरिषदेच्या कार्याचेही त्यांनी विशेष कौतुक केले. कोरोना काळात वैद्यकीय अधिकाऱ्यांमुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचले. डॉक्टरांच्या आरोग्य सेवेसाठी रनपनेही आवश्यक असणारी आरोग्य व्यवस्था उपलब्ध करून दिल्याने, अशा या सामूहिकरित्या केलेल्या कार्यामुळे कोरोनाचे गंभीर परिणाम वेळीच रोखता आले, असे अण्णा सामंत यांनी सांगितले.