राजापूर तालुक्यातील जैतापूर दळे येथील सलीम काझी यांच्या बागेमध्ये काम करणाऱ्या तीन नेपाळी कामगारांचा रविवारी रात्री अकस्मिक मृत्यू झाला. याप्रकारची माहिती नाटे पोलीसांना देण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ चौकशीची सूत्रे हलवून नक्की या तिघांचा मृत्यु कशामुळे झाला याचा शोध लावला.
त्यातील एक निर्मलकुमार ठाकूरी हा रविवारी कामानिमित्त रत्नागिरी शहरामध्ये आला होता. दुपारनंतर तो दळे येथिल बागेमध्ये परतला. त्या तिघांनी नशा येण्यासाठी पाण्यामध्ये जीओ सॉलव्हंट हे औषध मिसळुन पित असल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे. आंबा फवारणीसाठी वापरण्यात येत असलेल्या औषधाचा वापर केल्याने एकाच दिवशी संशयास्पद मृत्यु झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. अवघ्या चार तासामध्ये या तीन गुरख्यांना नशेच्या आहारी गेल्याने जीव गमवावा लागला आहे.
आंबा फवारणीमध्ये आंब्याचा आकार वाढीसाठी जीओ सॉलव्हंट औषधाचा वापर केला जातो. परंतु या गुरख्यांनी त्याचा जादा डोस सेवन केल्याने, विषबाधा होऊन या तिघांचाही आकस्मित मृत्यु ओढवल्याची माहिती नाटे सागरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी दिली.
मयत गुरख्यांची नावे गोविंद श्रेष्ठा, दिपराज पुर्णनाम सोप आणि निर्मलकुमार ठाकूरी अशी आहेत. नशेच्या आहारी गेल्याने, अवघ्या चार तासामध्ये पाठोपाठ तीन तरूण गुरख्यांचा मृत्यु झाल्याने अनेक चर्चांना ऊधाण आले होते. या गुरख्यांपैकी दोघांचा मृत्यू जिल्हा रुग्णालयात तर तिसऱ्याचा धारतळे प्राथमिक आरोग्य केंद्रात झाला.
या घटनेनंतर तात्काळ जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, नाटेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आबासाहेब पाटील, राजापूर पोलिस निरीक्षक परबकर, उपविभागिय पोलिस अधिकारी निवास साळोखे, यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष जाऊन पहाणी केली आहे.